नाशिक : रोहिणी, मृग नक्षत्रांपाठोपाठ आर्द्राने दगा दिला आणि आता पुनर्वसूचा पूर्वार्ध कोरडा गेल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील पाणीसाठ्यात घट होऊ लागली आहे. त्यातच आठवडाभरापूर्वी महापालिकेने पाणी बचतीसाठी केलेल्या पाणीकपातीची झळ आता नाशिककरांना जाणवू लागली असून, नुसत्याच भरून येणाऱ्या आभाळाकडे पाहत नाशिककरही आता ‘ये रे घना, ये रे घना...’ अशी आर्त साद घालू लागले आहेत. नाशिक तालुक्यात आतापर्यंत केवळ साडेचार टक्के पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षीही पावसाने सुरुवातीपासूच दमदार हजेरी लावली होती. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली होती. मागील वर्षी ११ जुलैपर्यंत गंगापूर धरणात १८८५ दशलक्ष घनफूट म्हणजे ३३ टक्के पाणीसाठा होता. यंदा तो १९११ दशलक्ष घनफूट म्हणजे एक टक्का अधिक ३४ टक्के असला तरी गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दिलेली ओढ पाहता उपलब्ध पाणीसाठ्याबाबत चिंता वाढल्या आहेत. मागील वर्षी ११ जुलैपर्यंत कश्यपी धरणात १४८ दशलक्ष घनफूट अर्थात आठ टक्के, तर गौतमी गोदावरी धरणात २३६ दशलक्ष घनफूट म्हणजे १३ टक्के पाणीसाठा होता. यंदा मात्र कश्यपी व गौतमी धरण पूर्णत: कोरडेठाक पडले आहे. दारणा धरणातील पाणीसाठ्याची तर भीषण स्थिती आहे. मागील वर्षी दारणा धरणात ५३ टक्के पाणीसाठा होता. यंदा तो अवघा पाच टक्के इतका शिल्लक राहिला आहे. गंगापूर धरणातील घटत चाललेला पाणीसाठा लक्षात घेऊन महापालिकेने ७ जुलैपासून पाणीकपातीचा निर्णय घेत शहरात एकवेळ पाणीपुरवठ्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, पुनर्वसू नक्षत्राच्या पहिल्या दोन्ही चरणातही पावसाने पाठ फिरविल्याने चिंता वाढल्या आहेत. महापालिकेने सुरू केलेल्या पाणीकपातीची झळ आता नागरिकांना जाणवू लागली आहे. एकवेळ पाणीपुरवठ्यामुळे पंचवटी, जुने नाशिक व नाशिकरोड परिसरातील काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारीत वाढ होऊ लागली आहे, तर काही भागात वरच्या मजल्यापर्यंत पाणी पोहोचत नसल्याच्या तक्रारी आहेत. याशिवाय पाण्यासाठी नागरिकांना रात्रीचा दिवसही करावा लागत आहे. हवामान खात्यासह पंचांगकर्त्यांनीही पुनर्वसूच्या तिसऱ्या व चौथ्या चरणात समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तविला आहे. गेल्या काही दिवसांपासून आभाळ नुसतेच भरून येते, पण पाऊस काही बरसत नसल्याने चिंतेत भरच पडते आहे. (प्रतिनिधी)
ये रे घना, ये रे घना
By admin | Updated: July 14, 2014 00:28 IST