नाशिक : देशात व राज्यात सध्या फोफावलेला भ्रष्टाचार, जातीयता व धर्मांधता नष्ट करण्याचे काम फक्त शिक्षकच करू शकतील, असे प्रतिपादन आमदार सुधीर तांबे यांनी केले. कॉँग्रेसच्या शिक्षक सेलच्या वतीने आयोजित आदर्श शिक्षक गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते. यंदा पहिल्यांदाच कॉँग्रेसच्या शिक्षक सेलच्या वतीने विविध शाळांमधील आदर्श शिक्षकांचा सत्कार कॉँग्रेस भवनात आयोजित करण्यात आला, त्यावेळी तांबे पुढे म्हणाले की, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांनी आपला जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. कारण देशात आदर्श नागरिक निर्माण करून त्यांना सुसंस्काराचे धडे देण्याचे कार्य शिक्षकच करू शकतो, याची त्यांना जाणिव होती, असेही तांबे म्हणाले. समाज शिक्षित करण्याची एकटी जबाबदारी शिक्षकांवरच असल्यामुळे समाजात शिक्षकांकडे पाहण्याचा दृष्टिकोनही आदर्श म्हणूनच आहे. सध्या देशाला भेडसाविणाऱ्या साऱ्या समस्यांचे मूळ शिक्षण हेच असल्याने असे शिक्षण देणाऱ्या शिक्षकांचा अभिमान बाळगणे साऱ्यांचेच कर्तव्य आहे. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, डॉ. हेमलता पाटील, शहराध्यक्ष शरद अहेर, उद्धव पवार, अण्णा पाटील, वसंत ठाकूर, बबलू खैरे, शोभा भंदुरेआदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष व्ही. डी. निकम व शहराध्यक्ष बी. एन. ठाकरे यांनी केले. (प्रतिनिधी)
शिक्षकांनी जातीयता निर्मूलन करावे
By admin | Updated: September 6, 2016 01:27 IST