नाशिक : इगतपुरी तालुक्यातील घोटी गावातील मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर असलेले टॅक्सी स्टॅण्डचे अतिक्रमण काढण्यास संबंधित यंत्रणा टाळाटाळ करत असल्याचा आरोप परिसरातील व्यापारीवर्गाकडून केला जात आहे. या टॅक्सी स्टॅण्डमुळे व्यापारी त्रस्त झाले आहेत. घोटी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी जुन्या मुंबई-आग्रा महामार्गालगत विजयराज कॉम्प्लेक्ससमोर घोटी टॅक्सी चालक-मालक संघटनेने दोन महिन्यांपूर्वी रातोरात अतिक्रमण करून टॅक्सी स्टॅण्ड सुरू केले आहे. संघटनेने या ठिकाणी स्वत:चे कार्यालयही थाटले आहे. ज्या जागेवर टॅक्सी स्टॅण्ड सुरू करण्यात आले आहे त्यातील काही जागा सार्वजनिक बांधकाम विभागाची, तर उर्वरित जागा विजयराज कॉम्प्लेक्सच्या मालकीची आहे. या टॅक्सी स्टॅण्डवर लावण्यात येणाऱ्या टॅक्सींमुळे या कॉम्प्लेक्समधील व्यावसायिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. दुकानात माल घेऊन येणारी वाहने आणि ग्राहकांची वाहने उभी करण्यास जागा मिळत नाही. यामुळे येथील गाळेधारक व्यापारी त्रस्त झाले आहेत. सदर टॅक्सी स्टॅण्डचे अतिक्रमण हटविण्याबाबत येथील व्यापाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले असून, माहिती अधिकारांतर्गत घोटी ग्रामसेवकांकडे तक्रार अर्ज केला आहे, मात्र ग्रामसेवकाने त्यास दाद न दिल्याने व्यापाऱ्यांनी इगतपुरी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे अपील केले. गटविकास अधिकाऱ्यांनी पत्र देऊनही ग्रामसेवक सुनावणीस हजर राहिले नाही. अखेरीस १४ जुलै २०१४ रोजी या प्रकरणी निकाल देऊन गटविकास अधिकाऱ्यांनी सदर जागेवरील टॅक्सी स्टॅण्डचे अतिक्रमण काढून टाकण्याबरोबरच त्या संबंधीचा ठरावही रद्द करण्याचे आदेश ग्रामसेवकास दिले आहेत, मात्र अद्याप याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे येथील व्यापारी दत्ता गायकवाड यांनी सांगितले. दरम्यान, यासंदर्भात व्यापाऱ्यांनी ९ आॅगस्ट रोजी घोटी पोलीस स्टेशनलाही तक्रार अर्ज दाखल केला असून, टॅक्सी स्टॅण्ड हटविण्याची मागणी केली आहे. अर्जावर ज्ञानेश्वर पंडित, त्र्यंबक खराटे, कमर अन्सारी, संजय लोखंडे, नेमीचंद गांधी, संतोष कडू, प्रशांत मुनोत, प्रभाकर चौधरी, हिरामण डावखर, प्रशांत रूपवते, सूरज भगत, विमल कोकणे, संतोष आडोळे आदिंसह ४० व्यापाऱ्यांची नावे व स्वाक्षऱ्या आहेत. (प्रतिनिधी)
घोटीत वर्दळीच्या ठिकाणी टॅक्सी स्टॅण्ड
By admin | Updated: August 13, 2014 00:46 IST