नाशिक : जिल्हा परिषद उपाध्यक्ष संपतराव सकाळे व अध्यक्ष जयश्री पवार यांचे स्वीय सहायक जी. पी. खैरनार यांच्यात झालेल्या हमरी-तुमरीनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी पदाधिकाऱ्यांच्या सर्वच स्वीय सहायकांच्या बदलीचे संकेत दिले आहेत.वर्षानुवर्षे एकाच जागेवर असलेल्या स्वीय सहायकांमुळेच पदाधिकाऱ्यांमध्ये वाद असल्याच्या निष्कर्षाप्रत प्रशासन आल्यानेच हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या स्वीय सहायक नेमणुकीवरून यापूर्वीही वाद झाले असून, अमुकच पी.ए. हवा यावरून प्रशासन विरुद्ध पदाधिकारी असा संघर्ष यापूर्वीही टोकाला गेल्याचे समजते. त्यात उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांनी अमुकच पी.ए. हवा म्हणून यापूर्वी थेट मुख्यमंत्र्यांनाही पत्र लिहिल्याचा इतिहास आहे, तर अध्यक्षांचे स्वीय सहायक बोलताना उर्मट बोलतात, अशी टीका काही अधिकाऱ्यांनी खासगीत बोलताना यापूर्वी केली आहे. कालच्या प्रकरणात तर थेट मंजूर नस्तीच संबंधित विभागातून पदाधिकाऱ्यांनी नेमलेले कर्मचारी घेऊन गेल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आल्याने, तर प्रशासन प्रमुख म्हणून सुखदेव बनकर यांनी कडक भूमिका घेतली आहे. पाच वर्षांपर्यंतच पदाधिकाऱ्यांना स्वीय सहायक ठेवता येतात, त्यानंतर त्यांच्या अन्यत्र बदल्या कराव्यात, असा शासन निर्णयच असल्याने त्यानुसार कार्यवाही करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. काही पदाधिकाऱ्यांचे स्वीय सहायक तांत्रिकदृष्ट्याही स्वीय सहायकपदी पात्र नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांनीही स्वीय सहायक बदलण्याचा मुद्दा सुखदेव बनकर यांच्याशी बोलताना लावून धरला आहे.(प्रतिनिधी)
स्वीय सहायकांवर बदलीची टांगती तलवार
By admin | Updated: September 2, 2014 01:11 IST