पंचवटी : गंगापूर धरणातील जलसाठा कमी झाल्याने काही महिन्यांपूर्वी प्रशासनाने जलतरण तलावाची पाणीकपात केली होती; मात्र आता पाणीकपात रद्द केल्यानंतर शहरातील सर्वच जलतरण तलाव सुरू झाले असले तरी पंचवटीतील स्वर्गीय श्रीकांत ठाकरे जलतरण तलाव अद्याप सुरू झालेला नाही. महापालिकेने ज्या ठेकेदाराला ठेका दिला आहे त्या ठेकेदाराकडूनच तलाव सुरू करण्यास दिरंगाई केली जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. काही वर्षांपूर्वी पंचवटीत जलतरण तलावाची निर्मिती केली होती. कधी तलावात पाणी नाही तर कधी अपूर्ण सुखसुविधा या कारणामुळे कायम वादात सापडलेला तरण तलाव आता पाणीकपात रद्द केल्यानंतर सुरू न झाल्याने पुन्हा वादात सापडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. प्रशासनाने पाणीकपात रद्द केल्यानंतर तत्काळ जलतरण तलाव नागरिकांसाठी खुला करणे गरजेचे होते; मात्र तसे झाले नसल्याने नागरिकांना जलतरण तलाव कधी सुरू होणार याची प्रतीक्षा करावी लागत आहे. (वार्ताहर)
पंचवटीतील जलतरण तलाव अजूनही बंदच
By admin | Updated: August 24, 2016 01:28 IST