नाशिक : विद्यार्थ्यांसाठीच्या मासिक पाससाठी नाममात्र शुल्क असताना सातपूर बसथांब्यावरील मासिक पास केंद्रावर ओळखपत्र व अर्जापोटी जास्तीचे पैसे आकारून विद्यार्थ्यांची लूट केली जात असल्याची तक्रार विद्यार्थी करीत असून, दुसरीकडे सुट्या पैशांवरून वाद होत असल्याचा खुलासा मासिक पास केंद्र कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला आहे. शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही शिक्षणाची गोडी लागावी आणि त्यांना सुलभपणे शिक्षणाचे दरवाजे खुले व्हावेत यासाठी शासनस्तरावरून विविध योजना राबविल्या जात आहेत. यातील बहुतांश योजना या मोफत असून, तर काहींना नाममात्र शुल्क आकारले जाते. याच माध्यमातून पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य परिवहन विभागाच्या वतीने पास सुविधा आहेत. विद्यार्थिनींसाठी अहल्याबाई होळकर ही मोफत प्रवासाची योजना आहे. शहराच्या आसपासच्या ग्रामीण भागातून शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये शिक्षणासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनी येत असतात. त्यासाठी त्यांना परिवहन महामंडळाच्या बसचा मासिक पास घ्यावा लागतो. सातपूर शहर बसथांबा येथे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी महामंडळाने मासिक पास केंद्र सुरू केले असून, हजारो विद्यार्थ्यांची त्यामुळे सोय झाली असली तरी याठिकाणी मात्र विद्यार्थ्यांची आर्थिक लूट केली जात असल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत. मासिक पाससाठीच्या अर्जाची दोन तर ओळखपत्रासाठी पाच रुपयांचे अर्ज असताना त्यासाठी पास केंद्रातील कर्मचाऱ्यांकडून १० रुपये आकारले जात असल्याचे पासधारक विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. तसेच, अर्जावर असलेल्या छापील किमतीवरच कर्मचारी शिक्का मारत असल्याने त्यावरील किंमत विद्यार्थ्यांना दिसत नाही. याबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेसच्या वतीने परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रक यामिनी जोशी यांच्याकडे निवेदन देऊन सदरील प्रकाराच्या चौकशीची मागणी केली आहे. यासंदर्भात तत्काळ कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. यावेळी राविकॉँचे शहराध्यक्ष चिन्मय गाढे, जुगल महाजन, हिमांशू चव्हाण, पारस घाटे, संकेत कराडे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)