नाशिक : नाशिक-पुणे महामार्गावरील उपनगर चौक सद्यस्थितीत अत्यंत धोकादायक बनला आहे. या चौकात वाहतूक नियोजनाची नितांत गरज असतानाही त्याकडे महापालिका, तसेच वाहतूक पोलिसांचेदेखील दुर्लक्ष होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. काही महिन्यांपूर्वी या चौकात अपघातात एका महिलेचा बळी गेल्यानंतर चौकातील वाहतूक नियोजनासाठी व्यवस्था केली जाईल, असे वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले होते. मात्र त्यानंतरही या चौकात वाहतूक पोलीस दिसला नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. नुकत्याच झालेल्या गणेशोत्सव काळात चौकातील वाहतूक यंत्रणा कोलमडून पडली होती. असे असतानाही या चौकात वाहतूक पोलिसाची नियुक्ती करण्यात आली नसल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागली. या कालावधीत चौकात दोन किरकोळ स्वरूपाचे अपघात झाले. सुदैवाने मोठी हानी झाली नसली तरी आणखी किती दिवस या चौकाला असुरक्षित ठेवले जाणार आहे, असा सवाल येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे. महापालिका हद्द आणि बांधकाम विभागाच्या अखत्यारितील महामार्ग येत असल्याने समन्वयाच्या अभावामुळे संपूर्ण रस्ताच धोकादायक बनला आहे. त्यातही उपनगर चौक अत्यंत धोकादायक बनला आहे. चौकातील धोका कमी करण्यासाठी येथील रस्ता दुभाजकाची लांबी वाढविण्यात येऊन दुभाजकाचे पंक्चर संकुचित करण्यात आले आहे. यामुळे वाहतुकीवर नियंत्रण मिळविण्याऐवजी वाहतूक कोंडीतच भर पडत आहे. नाशिकरोड आणि जयभवानी रोडकडील वाहने उपनगरला वळण्यासाठी चौकात एकत्र येतात. त्यातच रस्ता ओलांडण्यासाठी अत्यंत कमी जागा असल्याने कोंडी होते. ही नित्याचीच डोकेदुखी असतानाही कुणालाही याचे गांभीर्य दिसत नाही. (प्रतिनिधी)
उपनगर चौक अजूनही असुरक्षित
By admin | Updated: September 12, 2014 00:08 IST