नाशिक : कांदा-बटाटा व्यापाऱ्यांनी लिलावात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने सोमवारी (दि.२५) लासलगावसह जिल्ह्यातील बहुतांश कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांदा-बटाटा विक्रीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र व्यापाऱ्यांनी अहमदनगर-राहुरीच्या धर्तीवर गोणीत भरून आणलेल्या कांदा व बटाट्याचा लिलाव करण्याची अट टाकल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत आधीपासूनच कांदा व बटाट्याची गोणी भरून खरेदी-विक्रीचे लिलाव होत आहेत. मात्र लासलगाव, पिंपळगाव या कांदा खरेदी- विक्रीच्या प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील कांदा-बटाटा व्यापाऱ्यांनी लिलावात सहभागी न होण्याची भूमिका घेतल्याने गेल्या काही दिवसांपासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अडचण झाली होती. त्या पार्श्वभूमीवर लासलगाव व पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी नवीन परवाने देण्याबाबत जाहिरात दिल्यानंतर व्यापाऱ्यांनी नमते घेतल्याची चर्चा होती. सोमवारपासून कांदा व बटाटे व्यापाऱ्यांनी परवाने परत घेण्यास सुरुवात केल्याने मंगळवारपासून कांदा व बटाटा विक्रीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र या व्यापाऱ्यांनी अहमदनगर व राहुरीप्रमाणे गोणीमार्केट सुरू करण्याची अट टाकली आहे. त्यानुसार बाजार समित्यांनी शेतकऱ्यांना गोणीत भरून माल आणण्याचे आवाहन केले आहे. मात्र गोणी आणि गोणीत भरण्याची हमाली असा सरासरी क्विंटलमागे ७० ते ८० रुपयांचा खर्च शेतकऱ्यांच्या माथी येणार असल्याने शेतकऱ्यांनी या गोणीमार्केटला विरोध केला आहे. त्यामुळे मंगळवारपासून होणाऱ्या कांदा-बटाटे विक्री व्यवहाराकडे सहकार विभागाचे लक्ष राहणार आहे. (प्रतिनिधी)
आजपासून कांदा लिलाव होणार सुरू
By admin | Updated: July 25, 2016 23:06 IST