नाशिक : गेल्या काही दिवसांपासून पावसाने संततधार हजेरी लावल्याने खरिपाच्या पेरण्यांना वेग आला आहे. तसेच त्र्यंबकेश्वर व इगतपुरीत पावसाचा जोर कायम असल्याने तेथील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. जिल्ह्यात जुलै महिन्याच्या सरासरीच्या १५ टक्के पावसाची हजेरी आतापर्यंत झाली आहे.सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात ५१. १ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली असली तरी सोमवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच असल्याने पावसाच्या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता आहे. सोमवारी सकाळी नोंदविण्यात आलेल्या ५१.१ मिलिमीटर पावसाच्या हजेरीत सर्वाधिक हजेरी इगतपुरी-१९, पेठ-१५, त्र्यंबकेश्वर-९, दिंडोरी-३ व अन्य तालुक्यांत अत्यल्प पावसाची नोंद झाली आहे. पश्चिम पट्ट्यात झालेल्या दमदार पावसामुळे मात्र भात व नागलीच्या रोपांना जीवदान मिळाले असून, जळण्याच्या मार्गावर असलेल्या या दोन्ही रोपांसह भुईमुगालाही काही प्रमाणात संजीवनी मिळाली आहे. मात्र पाऊस उशिराने सुरू झाल्याने ही तीनही पिकांचे पश्चिमपट्ट्यात ५० टक्केच उत्पादन होणार असल्याचे शेतकरी सांगतात. जिल्ह्याचे खरिपाचे एकूण सहा लाख ३४ हजार ६०० हेक्टर क्षेत्र असून, आतापर्यंत त्यापैकी २९ हजार हेक्टर (४ टक्के) क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत.पावसाचा असाच जोर पश्चिमपट्ट्यासह पूर्वभागात वाढल्यास खरिपाच्या पेरण्यांना गती येण्याची शक्यता आहे.(प्रतिनिधी)
पाऊस सुरूच, सरासरीत वाढ
By admin | Updated: July 22, 2014 01:17 IST