पावसाचे माहेरघर अशी ओळख असलेला त्र्यंबकेश्वर तालुका टंचाईच्या खाईत आहे. त्याला कारणही तसेच आहे. प्रशासनाच्या कमालीच्या दुर्लक्षामुळे आज ७४ पैकी केवळ चार योजना पूर्णत्वास आल्याने गावे, वाडे, पाडे अद्यापही तहानलेली आहेत.त्र्यंबकेश्वरला दरवर्षी २२०० ते २५०० मि.मी. पावसाची नोंद होत असताना ही स्थिती आहे. प्रशासनाच्या आकडेवारीनुसार ६९ योजना भौतिकदृष्ट्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र त्या पूर्ण होण्यास दहा वर्षे लागल्याचा इतिहास आहे. उर्वरित पाच योजनांबाबत तर न बोललेलेच बरे अशी स्थिती आहे. त्यामुळेच तालुक्यातील एक लाख ३६ हजार नागरिक तहानलेलेच आहेत. ४० गावे आणि ६० वाड्यांवर टंचाईचे सावट असताना, केवळ पाच टँकर सुरु आहेत. त्यामुळे पावसाळ्यातही पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी पहाटे तीन वाजेपासून रांगा लागतात. यासाठी मंजूर टँकर आणि प्रत्यक्षात सुरू असलेले टँकर याबाबत गांभीर्याने चौकशी होणे गरजेचे आहे. तालुक्यातील सर्वच धरणांत आता मृतसाठा शिल्लक असताना, प्रशासकीय यंत्रणा अद्यापही ढिम्म आहे. येत्या दोन दिवसांत पावसाचे आगमन न झाल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येणार आहे.
स्पॉट : त्र्यंबकेश्वर टंचाईमुळे माहेरघरीच सासुरवास
By admin | Updated: June 30, 2014 00:24 IST