विंचुरे : बागलाण तालुक्यातील पश्चिम भागातील विंचुरे, वटार, जोरण, किकवारी भागातील पेरण्या जवळपास पूर्ण झाल्या असून, आता बळीराजा अजूनही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.दरवर्षापेक्षा यावेळी पावसाने किमान दीड महिने उशिरा हजेरी लावली. पाऊस पडेपर्यंत शेतकरी आभाळाकडे चातक पक्षाप्रमाणे किलकिल्या नजरेने वाट पाहत होता. रोहिनी, मृग, आर्द्रा नक्षत्र पूर्ण कोरडे गेल्याने बळीराजाच्या पावसाच्या अपेक्षा धुळीस मिळाल्या होत्या. मात्र जुलै महिन्याच्या अखेरीस पावसाने दमदार हजेरी लावून धीर दिला. पेरणीयोग्य पाऊस झाल्यामुळे शेतकरी कामाला लागला. आज जवळपास पेरण्या पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. कांदा जर थोडा लवकर लागला तर दोन पैसे पदरात पडतील अशी आशा शेतकऱ्यांना आहे.