नाशिक : स्वच्छ भारत अभियानांतर्गत नाशिक जिल्हा परिषदेने शौचालय बांधकाम व हगणदारी मुक्त गाव यात चांगली कामगिरी केल्याबद्दल राज्याचा पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग तसेच युनिसेफच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर व उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे या दोघांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. राज्यात हगणदारी मुक्त अभियानात नाशिक जिल्हा परिषदेने सहावा क्रमांक पटकाविला. नाशिक जिल्ह्याला सन २०१५-१६ या वर्षात ३२,१५६ इतकी शौचालये ग्रामीण भागात बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते, मात्र जिल्ह्याने ३६,५८५ इतकी शौचालये बांधून उद्दिष्ट्यपूर्तीपेक्षा अधिक काम केल्याने शौचालय बांधकामात नाशिक जिल्ह्याने पाचवा क्रमांक पटकाविला. यातही जिल्ह्याने ३०१ ग्रामपंचायती हगणदारीमुक्त करून राज्यात सहावा क्रमांक पटकाविला आहे. (प्रतिनिधी)
स्वच्छ भारत अभियानात जिल्हा राज्यात सहावा
By admin | Updated: May 22, 2016 22:27 IST