नाशिक : कोरोनाकाळात नोकरी, धंदा करणाऱ्या प्रत्येक क्षेत्रातील नागरिकांना तसेच कोणतेही उत्पन्न घरात येत नसताना घर चालवणाऱ्या गृहिणी अशा निम्म्याहून अधिक नागरिकांना आर्थिक ताणतणाव, भविष्यात काय होणार यासारख्या चिंतेने ग्रासले होते. त्यातही जे नागरिक मानसिकदृष्ट्या भक्कम होते किंवा ज्यांचा कुटुंबीयांशी सातत्याने संवाद होता, अशा नागरिकांमध्ये नैराश्याचे प्रमाण तुलनेत कमी होते. मात्र, आर्थिक स्थिती बिकट, भविष्याची चिंता, तसेच कुणाशीही मनमोकळा संवाद नसल्याने आलेल्या मानसिक दडपणामुळे नैराश्यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच या आजारांशी निगडित औषधांच्या विक्रीतही लक्षणीय वाढ झाली आहे.
कोरोनाकाळातील विविध समस्यांमुळे मानसिक आजाराच्या बाबतीत पुरुषांसह महिलांच्या मानसिक आजाराच्या प्रमाणात चिंताजनक वाढ झाल्याचे दिसून येत आहे, त्यात उदासीनता, डिप्रेशन, स्किझोफ्रेनिया, व्यसनाधीनता आणि व्यक्तिमत्त्व विकृती यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येते. कोरोनाच्या काळात सध्या सर्वाधिक मानसिक आजार हे युवा आणि मध्यमवयीन पिढीला सतावत आहेत. कोरोनाकाळातील आर्थिक अडचणी, नोकरीच्या अडचणी, सामाजिक दडपण यासारख्या मोठमोठ्या घडामोडींमुळे ते सहज मानसिक तणावाखाली जातात. त्यातून त्यांना मानसिक विकार होण्याचेही प्रमाण वाढले आहे. नैराश्य आणि चिंताविकार या मानसिक आजारांचे मुख्य कारण ताणतणाव हेच असते. तसेच तारुण्यात कर्तृत्व गाजवून झाल्यानंतर आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात कामाविना नुसतेच बसून राहणाऱ्या ज्येष्ठांमध्येदेखील मानसिक आजारांचे प्रमाण अधिक दिसून येऊ लागले आहे. या आजारांशी लढण्यासाठी प्रभावी व्यूहरचना आणि धोरण लागू करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
इन्फो
मनातलं बोलण्यासाठी जवळचं कुणी हवं
पूर्वीच्या काळी संयुक्त कुटुंब पद्धती असल्याने आपल्या समस्यांबाबत कुटुंबातील लोक घरातील इतर सदस्यांशी बोलत आपले मन हलके करत असत, तसेच एकत्रित कुटुंबात कुणा एकाच व्यक्तीवर घर चालणे किंवा ठप्प होत नव्हते. त्यामुळे कुणाची ना कुणाची थोडीफार कमाई झाली तरी कुटुंब चालत होते. मात्र, आता विभक्त कुटुंब पद्धतीत हे शक्य होताना दिसत नसल्याने मानसिक आजार वाढीमागील तेदेखील प्रमुख कारण आहे. जीवनात चढ-उतार येत असतात. आयुष्यात अनेक कटू अनुभवदेखील घ्यावे लागतात, हे सांगणारी ज्येष्ठांची पिढीच घरात नसल्यानेही खूप फरक पडला. सगळेच दिवस सारखे नसतात, हे दिवसही जातील, असे सांगून धीर देणारा मायेचा हात कुटुंबात असेल, तर संबंधिताला आलेले नैराश्यदेखील दूर केले जाऊ शकते.
------------------------------
इन्फो
कोरोना लाटेमुळे आर्थिक आघाताइतकाच मानसिक आघातदेखील खूप प्रचंड प्रमाणात झाला. मात्र, आपल्याकडे मनाबाबत तितकीशी सजगता नसते. मात्र, कोरोनाकाळात सल्ला किंवा मानसोपचाराचा सल्ला किंवा उपचार घेण्याच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. अनेक घरांमध्ये आर्थिक विवंचना किंवा भविष्याच्या चिंतेपायी मोठ्या प्रमाणात ताणतणाव वाढला. मानसिकदृष्ट्या संवेदनक्षम असलेल्या नागरिकांवर त्याचा मोठा परिणाम झाला. त्यामुळेच सल्ला तसेच उपचारासाठी येणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे.
---------------
कोरोनापूर्वीच्या काळात आमच्या दुकानात दिवसाला मानसोपचाराशी निगडित औषधी घेण्यासाठी केवळ तीन-चार प्रिस्क्रिप्शन यायचे. मात्र, आता तेच प्रमाण दिवसात सहा ते सात इतके वाढले आहे. कोरोनामुळे अनेकांना ताणतणाव आल्याने रुग्णसंख्येत वाढ झाल्यामुळेच या औषधांचा खपदेखील वाढला आहे.
प्रशांत सोनजे, औषध विक्रेता
--------------
कोरोनाच्या काळात नोकरीवर संकट निर्माण झाल्याने तणाव वाढला होता. त्यावेळी मानसिक तणावासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागला होता. त्यामुळे औषधोपचार सुरू असून अजून काही काळ औषधोपचार सुरूच ठेवावा लागणार आहे.
नीलेश शेगोकार, नागरिक
पूर्ण व्यवसायच संपुष्टात येतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे आर्थिक, मानसिक प्रचंड ताणतणाव निर्माण झाल्याने डॉक्टरांकडून उपचार घ्यावे लागले; पण आता पूर्वीच्या तुलनेत तणावदेखील कमी झाला असल्याने अजून उपचाराची आवश्यकता उरलेली नाही.
जितेन पटेल, नागरिक
----------------(डमी आहे.) -------------