नाशिक : महापालिकेच्या घरकुल योजनेसाठी अंदाजपत्रकात केलेली तरतूद स्थायी समितीने वगळली असून, त्यामुळे घरकुले कशी बांधावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात अनेक चुका आहेत. परंतु स्थायीच्या अंदाजपत्रकातही अनेक गोंधळ आहेत. असाच प्रकार घरकुल योजनेच्या बाबतीत घडला आहे. मनपाच्या घरकुल योजनेसाठी आयुक्तांच्या अंदाजपत्रकात असलेली सुमारे १११ कोटी रुपयांची तरतूदच स्थायी समितीने रद्द केली असून, त्यामुळे घरकुले कशी पूर्ण करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मनपाच्या वतीने ११ हजार २०० घरकुलांचे काम सुरू आहे. त्यातील काही घरांचे काम पूर्ण झाले असले तरी अनेक कामे बाकी आहेत. त्यामुळे पालिकेने हुडकोकडून ९० कोटी रुपयांचे कर्ज उभारण्याची तयारी केली आहे. त्यामुळेच अंदाजपत्रकात तरतूद होती. परंतु अंदाजपत्रकातील ही तरतूदच अन्य कामांसाठी वर्ग करण्यात आल्याने घरकुले कशी बांधणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मंगळवारी स्थायीच्या बैठकीत यावर चर्चा होण्याची शक्यता असून, महापौर त्यावर काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागून आहे. (प्रतिनिधी)