नाशिक : मान्सूनने केवळ नावालाच हजेरी लावल्याने शहर व जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बुधवारी (दि.२५) यासंदर्भात तातडीची बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी बोलविली आहे.सोमवारी मुख्यालयात सुखदेव बनकर यांनी खातेप्रमुखांची नियमित आढावा बैठक घेतली. त्यात आचारसंहिता लवकरच लागू होणार असल्याने आचारसंहितेत कोणतीही विकासकामे अडकू नयेत, म्हणून आवश्यक त्या उपाययोजना राबविण्याबाबत त्यांनी खातेप्रमुखांना सूचना दिल्या. जिल्हा परिषदेच्या वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यासाठी आचारसंहितेपूर्वीच लाभार्थ्यांची निवड करावी. तसेच जिल्हा नियोजन समितीकडून आलेल्या निधीतून विकासकामे ही आचारसंहितेपूर्वीच सुरू केली जावीत. त्यासाठी तांत्रिक व प्रशासकीय मान्यता घ्यावी, अशा सूचना त्यांनी खातेप्रमुखांना दिल्या. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील पाणीटंचाईचा आढावा घेतला. पाऊस लांबल्याने जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले असून, तेथे तात्पुरत्या स्वरूपात पाणीपुरवठा योजनांबाबत, तसेच पाणी उपलब्ध करून देण्याबाबत काय उपाययोजना कराव्या लागतील, याची तपशीलवार माहिती घेण्यासाठी व नियोजन करण्यासाठी बुधवारी (दि.२५) त्यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसह पाणीपुरवठा संदर्भात निगडित असलेल्या सर्व खातेप्रमुखांची बैठक बोलविली आहे. या बैठकीत ते पाणी टंचाईवर आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी चर्चा करणार आहेत.(प्रतिनिधी)
पाऊस लांबल्याने टंचाईचे सावट
By admin | Updated: June 24, 2014 00:34 IST