नाशिक : सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सवात साहित्यरसिकांना वैचारिक मेजवानी लाभणार असून, दि. २७ व २८ सप्टेंबर रोजी जिल्हा साहित्यिक मेळावा माधवराव लिमये सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्याच्या अध्यक्षपदी डॉ. मीना वैशंपायन यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती सावानाचे कार्यवाह मिलिंद जहागीरदार यांनी दिली.गेल्या ४७ वर्षांपासून नवरात्रीच्या पहिल्या शनिवारी-रविवारी जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. यंदा शनिवार, दि. २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या कविसंमेलनाचे उद्घाटन अॅड. नंदकिशोर भुतडा यांच्या हस्ते होणार असून, कवी आसिफ सय्यद यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कविसंमेलनाचे सूत्रसंचालन कवी मनोहर विभांडिक व अपर्णा क्षेमकल्याणी करतील. दि. २८ सप्टेंबर रोजी अनिल अवचट यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन होईल. त्यानंतर डॉ. मीना वैशंपायन यांची मुलाखत स्वानंद बेदरकर घेतील. याचवेळी कथा-कविता स्पर्धेचे पारितोषिके दिली जातील. दुपारच्या सत्रात ‘समाजाला ललित साहित्याची गरज नाही’ या विषयावरील परिसंवादात प्रा. अनंत येवलेकर, अभय सदावर्ते, शंकर बोऱ्हाडे, डॉ. सतीश श्रीवास्तव, वंदना अत्रे, डॉ. दिलीप धोंडगे व किशोर पाठक सहभागी होणार आहेत. त्यानंतर नंदन रहाणे ‘आठवणींची चाळता पाने’ हा कार्यक्रम सादर करतील. ‘व्हॉट्स अॅप मिश्किली’ हा मनोरंजनपर कार्यक्रमही होईल. समारोप मराठी लघुपटांच्या प्रदर्शनाने होईल. यामध्ये पिस्तुल्या, लपंडाव व प्रिंटेड रेनबो ह्या लघुपटांचे सादरीकरण रघुनाथ फडणीस करणार आहेत. (प्रतिनिधी)