मुंजवाड : तब्बल दीड महिन्याच्या विश्रांतीनंतर बुधवारी पहाटेपासून रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने बळी राजा सुखावला आहे. या पावसामुळे खोळंबलेल्या पेरण्यांना उघडिपीनंतर गती मिळणार आहे.मुंजवाडसह परिसरात जून महिन्याच्या पहिल्या सप्ताहात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या होत्या. मात्र पेरणी योग्य पाऊस नसल्याने या परिसरातील पेरण्या खोळंबल्या होत्या. जून महिना कोरडा गेल्यानंतर अर्धा जुलै संपत आला तरी पाऊस लांबलेलाच होता. बुधवारी पहाटेपासून परिसरात रिमझिम पावसाबरोबर अधूनमधून जोराच्या सरी कोसळत होत्या. संततधारेमुळे खोळंबलेल्या पेरण्यांना आता गती मिळणार आहे. पाऊस उशिरा झाल्याने या परिसरातील मका पिकाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट होणार असल्याचे चित्र निर्माण होणार आहे. नेहमीप्रमाणे आॅक्टोबर, नोव्हेंबरमध्ये या भागातील मका काढून उन्हाळी कांद्याची लागवड होत असे. मात्र पाऊस उशिरा झाल्याने यावर्षी उन्हाळी कांद्याची लागवडही उशिरा होणार आहे. पेरणीबरोबरच या भागातील चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला होता. आता झालेल्या पावसामुळे रस्त्यांच्या काठाबरोबरच जंगल परिसरात गवताची निर्मिती होऊन भाकड जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही मार्गी लागणार आहे. परिसरातील पिंपळदर, दऱ्हाणे, नवेगाव, तिळवण, निमताणे, निरपूर या परिसरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. या पावसामुळे काही प्रमाणात पाण्याचा प्रश्न कमी झाला आहे. अजूनही या परिसराला जोरदार पावसाची अपेक्षा असल्याचे शेतकरी वर्गात बोलले जात आहे. (वार्ताहर)
मुंजवाड परिसरात संततधार
By admin | Updated: July 24, 2014 00:59 IST