नाशिक : येथील श्रीरंग सारडा चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे ‘सारडा समान संधी पुरस्कार’ हा राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार समाजासाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती/संस्था यांना प्रदान करण्यात येत होता. पुरस्कार सुरू करताना निश्चित केलेला हेतू साध्य होत असल्याने यंदा या पुरस्काराची सांगता करण्यात येत असल्याची घोषणा फाउंडेशनचे विश्वस्त श्रीरंग सारडा यांनी केली आहे.समाजासाठी कार्य करणाऱ्या अनेक व्यक्ती, संस्था देशभरात आहेत. त्यांना शोधून त्यांचे कार्य समाजापुढे आणणे, जेणेकरून चांगल्या कामावरचा समाजाचा विश्वास वाढून समाजकार्य ही चळवळ व्हावी या उद्देशाने सन २००० पासून राष्ट्रीय पातळीवर सारडा समान संधी पुरस्कार योजना सारडा फाउंडेशनतर्फे सुरू करण्यात आली. गेली १४ वर्षे अखंडपणे हा पुरस्कार देऊन देशाच्या विविध भागांत समाजासाठी कार्यरत असणाऱ्या, कधीही प्रकाशझोतात नसणाऱ्या व समाजसेवेचे अखंड व्रत घेतलेल्या १४ व्रतस्थींना समाजापुढे आणता आले. त्यामुळे समाजात चांगल्या कामावरचा विश्वास तर वाढलाच त्याबरोबरच अनेक उदयोन्मुख व्यक्ती/संस्था समाजकार्यासाठी पुढे सरसावल्याचे चित्र निर्माण झाले आहे, असे सारडा यांनी सांगितले. निश्चित केलेल्या निकषांनुसार संस्था/व्यक्ती यांचा शोध घेण्याचे काम संस्थेच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण भारतभर फिरून केले जात होते. आजपर्यंत गौरविण्यात आलेल्या सर्वच पुरस्कारार्थींनी आपले मनोगत व्यक्त करताना सारडा समान संधी पुरस्कारामुळे आम्हाला समाजसेवेसाठी अधिक बळ लाभले आहे, ही समान भावना व्यक्त केली आहे आणि हेच या पुरस्काराचे फलित आहे, अशी भावना विश्वस्त श्रीरंग सारडा यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)
सारडा समान संधी पुरस्काराची सांगता होणार
By admin | Updated: July 30, 2014 00:23 IST