नाशिक : जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतिपदांची निवड ४ आॅक्टोबरला होऊ घातली असली, तरी सर्वच पक्षांच्या आघाडीवर सामसूम असल्याचे चित्र आहे. विधानसभा निवडणुकीच्या २ आॅक्टोबरला माघारी झाल्यानंतरच जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीच्या हालचालींना वेग येणार आहे.जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतिपदासाठी ४ आॅक्टोबरला निवडणूक होत असून, त्यासाठी प्रशासनाच्या वतीने जिल्हा परिषद सदस्यांना सभेची पत्रेही पाठविण्यात आली आहेत. २१ सप्टेंबरला झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी व कॉँग्रेसच्या आघाडीत बिघाडी होऊन राष्ट्रवादीच्या उमेदवाराने सरळ सरळ कॉँग्रेसच्या उमेदवाराला पराभूत केले होते. त्यावेळी कॉँग्रेसच्या नेत्यांनी व निरीक्षकांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. आता मधल्या काळात कॉँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे भाजपात गेल्याने त्यांचे चार समर्थक सदस्य काय भूमिका घेतात, याला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्याचप्रमाणे कळवण येथील कॉँग्रेसच्या महिला सदस्याच्या पतिराजाला भाजपाकडून विधानसभेची उमेदवारी मिळण्याची चर्चा असल्याने कॉँग्रेसचे संख्याबळ आणखी कमी होण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या गोटात कमालीची शांतता असून, त्यांच्या सदस्यांचे राष्ट्रवादीच्या सदस्य पदाधिकाऱ्यांशी असलेली सलगी पाहता या विषय समिती सभापतिपदाच्या निवडणुकीतही सेना तटस्थ राहिल्यास राष्ट्रवादीच्या झोळीत सर्व चारही विषय समिती सभापतिपदे पडण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
विषय समितीसाठी पक्षांच्या आघाडीवर सामसूम
By admin | Updated: September 26, 2014 23:41 IST