पंचवटी : गेल्या तीन-चार दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने सकाळपासूनच नागरिकांसह तपोवन साधुग्राममध्ये आलेल्या साधू-महंतांना तसेच भाविकांनादेखील उन्हाचा तडाखा सहन करावा लागत असल्याने साधू-संत व भाविकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. दुपारच्या वेळी तर उन्हामुळे साधू-महंत घामाघूम होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. तपोवन साधुग्रामची उभारणी करताना छतावर पत्रे वापरलेले आहेत. त्यातच सध्या गेल्या तीन-चार दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे छतावरील पत्र्यांमुळे आणखीनच उष्णता निर्माण होत असल्याने उकाडा सहन करावा लागत आहे. दुपारच्या वेळी तर असह्य उकाडा सहन करावा लागत असल्याने अनेक साधू-महंत राहुटी बाहेर तसेच तंबूत मोकळ्या हवेत बसतात, तर कोणी राहुटीबाहेर मोठे पंखे लावून भक्तांशी चर्चा करतात. साधू-महंतांबरोबर तपोवनात देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांनाही उन्हाचे चटके सहन करावे लागत असल्याने अनेक भाविक दुपारच्या वेळी जवळपास असलेल्या मंदिर तसेच मठ किंवा साधू-महंतांच्या आखाड्यात थांबून उन्हापासून बचाव करत आहेत. (वार्ताहर)
उकाड्यामुळे साधू-महंत घामाघूम
By admin | Updated: September 5, 2015 23:04 IST