येवला : पावसाळा सुरू झाल्यानंतर महिन्यापासून येवला शहर व परिसरासह दहा किलोमीटर परिघात दडी मारलेल्या पावसाने रविवारी दुपारी तासभर हजेरी लावली. पावसाचे आगमन झाल्याने अनेकांच्या चेहऱ्यावरची कळी खुलली. पाणीटंचाईच्या भीषण संकटाने ग्रासलेल्या पालिका प्रशासनाने अद्यापही सुटकेचा नि:श्वास सोडलेला नाही. धरण क्षेत्रात चांगला पाऊस होऊ दे आणि पाणी संकट दूर होऊ दे, अशीच प्रार्थना आजही कायम आहे. पाऊस लांबल्यामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य तीव्र पाणीटंचाईच्या भीतीने येवला शहरवासीय चिंतेत होते. हवामान खात्याने दोन दिवसांपूर्वी रविवारपर्यंत पाऊस दाखल होण्याचा अंदाज वर्तवला होता. अखेर ४ आठवड्यांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने रविवारी तासभर हजेरी लावली. अद्यापही पेरणीयोग्य पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.यंदा जूनच्या सुरुवातीलाच चांगला पाऊस असल्याचा हवामान खात्याचा अंदाज खोटा ठरला. पावसाळ्याच्या सुरुवातीपासून पावसाने दडी मारल्याने खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत. अशा स्थितीत शेतकऱ्यांंचे डोळे आभाळाकडे लागलेले असताना रविवारी पाऊस पडता झाला. आता पावसाने रोज यावे, अशीच अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. ओला दुष्काळ परवडला पण पाऊस हवाच, अशी भावनादेखील शेतकरी व्यक्त करीत आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ हवामान असले तरी पावसाने शहरासह तालुक्याला हुलावणी दिल्याचे चित्र होते. ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट नाही, वादळवारा नाही अशातच रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरणामुळे जोरदार पाऊस येण्याची शक्यता वाटत होती. दुपारी साडेअकराच्या सुमारास शहरासह तालुक्यात पावसाचे आगमन झाले. गेल्या तीन वर्षांपासून येवला तालुक्यात पावसाचे प्रमाण कमीच राहिले आहे. यंदा पाणीटंचाईचा सामना करताना तालुकावासीय व प्रशासन मेटाकुटीला आले आहेत. त्यात जून संपला तरी पावसाचा पत्ता नसल्याने शेतकरी व प्रशासन हवालदिल झाले होते. पाऊस सुरू झाला म्हणून आता सर्वांच्याच चेहऱ्यावरची कळी खुलली आहे.
रु सलेला वरुणराजा परतला
By admin | Updated: July 3, 2016 23:58 IST