नाशिक : समाजातील प्रत्येक महान पुरुषामागे महिलांची भूमिका अनमोल आहे. त्यासाठी प्रत्येक स्त्रीजन्माचे स्वागतच केले पाहिजे, असे प्रतिपादन नगरसेविका सुषमा पगारे यांनी केले.ग्रामीण व शहरी भागातील फुटपाथवर राहणारे व दगडखाण क्षेत्रात कष्टकरी महिलांचे सबलीकरण व विकासात्मक परिवर्तन करण्यासाठी संतुलन संस्था सतत वीस वर्ष कार्यरत आहेत. याच संस्थेच्या वतीने महिला दिनाच्या औचित्यावर २० व्या संतुलन कष्टकरी शेतकरी महिला परिषदेचे आयोजन येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात करण्यात आले होते. महिला परिषदेचे उद्घाटन नगरसेविका डॉ. सीमा ताजणे यांच्या हस्ते करण्यात आले. पत्रकार संगीता फुके यांच्या हस्ते संतुलन दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. प्रमुख उपस्थितांमध्ये डॉ. श्रद्धा ठोंबरे, महिला हक्क संरक्षण समितीच्या मीनाक्षी मराठे संतुलन संघटनेच्या अध्यक्ष अॅड. पल्लवी रेगे, दगडखाण कामगार परिषदेचे अध्यक्ष अॅड. बी. एम. रेगे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अॅड. पल्लवी रेगे यांनी सांगितले की, समाजामध्ये स्त्रियांना समान अधिकार मिळाल्याशिवाय समाजात संतुलन येणार नाही. प्रत्येक मुलाच्या नावात आईचे नाव व प्रत्येक घर हे महिलेच्या नावावर असले पाहिजे. अध्यक्षीय भाषणात नगरसेविका सुषमा पगारे यांनी समाजातील प्रत्येक बदलात महिलांची अनमोल भूमिका असल्याचे सांगितले. यावेळी अनेक महिला बचत गटांचे सत्कार करण्यात आले. सूत्रसंचालन मंगल कानवडे यांनी केले तर आभार रमेश सावंत यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मायाराम नवले, राजेंद्र जाधव, सविता वळवी, प्रणिता चव्हाण, देवराम पवार, चिमन वळवी, वैजयंता वाकचौरे यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)
महिलांची भूमिका अनमोल
By admin | Updated: March 12, 2017 01:12 IST