मालेगाव : शहरातील सर्व रस्त्यांवर विशेषत: गणेश मिरवणूक मार्गांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, संबंधितांनी खड्डे बुजवावे, अशी मागणी मालेगाव शहर मध्यवर्ती गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष राम गवळी यांनी केली आहे. शहरातील सर्वच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. यामुळे गणेशभक्तांना गणेश स्थापनेसाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. शहरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू असून, पाचकंदील, शनि चौक, रामसेतू पूल, संगमेश्वर, मोतीबाग नाका, जुना आग्रा महामार्ग, कॅम्प रस्ता, सटाणा रस्ता, सोयगाव आदि भागातील सर्वच चौक व रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने रहिवाशांना, वाटसरुंना तसेच वाहनचालकांना त्याचा अंदाज न आल्याने ते त्यात जाऊन अपघात होऊन अनेक जण जखमी झाले आहेत. तसेच या खड्ड्यातील पाणी उडाल्याने रोजच बाचाबाची व हाणामारीच्या घटना घडत आहेत. शहरातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली असूनही महानगरपालिका त्याकडे काणाडोळा करत आहेत. महापालिका शहरातील रस्त्यांवर वर्षाकाठी कोट्यवधी रुपये खर्च झाल्याचे दाखवीत असूनही शहरातील रस्ते सुधारत नाही हे विशेष. शहरात रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते इतकी दयनीय परिस्थिती येथील रस्त्यांची आहे. मनपातर्फे तयार करण्यात येणारा एकही रस्ता महिनाभरापेक्षा जास्त दिवस टिकत नसल्याचे दुरुस्त केलेल्या रस्त्यांवरून अनेकवेळा उघडकीस आले आहे. शहरातील मोसमपूल ते कॅम्प रस्त्यावर एक कोटी रुपयाचा खर्च केल्याचे कागदोपत्री असूनही महापालिका अस्तित्वात आल्यापासून हा रस्ता खड्डेमुक्त झालेला नाही. शहरवासीय रस्त्यांमुळे त्रस्त असतानाही नगरसेवक त्याविरोधात आवाज उठवित नाहीत. या रस्त्याची करण्यात येणारी डागडुजी काही तासातच उखडण्यात सुरुवात होते. असे असतानाही याची कोणतीही चौकशी सरकार दरबारी का होत नाही, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आहे. आगामी गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर या रस्त्यांची गुणवत्तापूर्ण डागडुजी करण्यात यावी, अशी मागणी मध्यवर्ती गणेश उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.