कळवण : कळवण - अभोणा -कनाशी- हतगड या राज्यमार्ग १७ रस्त्यावर जिरवाडा शिवारात सुरू असलेल्या पुलाच्या भराव कामावर मुरूम वाहणाऱ्या अवजड वाहनांमुळे जिरवाडा ते शिवभांडणे रस्त्याची दुरवस्था झाली असून, हा रस्ता पूर्णपणे खचला आहे. आदिवासी बांधवांसाठी जीवघेणा ठरला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदाराकडून तत्काळ रस्ता दुरुस्त करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. कळवण तालुक्यातील कनाशी-हातगड रस्त्यावर तीन ठिकाणी पुलांचे काम सुरू आहे. या पुलांचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्यापूर्वी करून घेणे गरजेचे होते. परंतु ठेकेदाराच्या आडमुठे धोरणापुढे सार्वजनिक बांधकाम विभाग हतबल झाल्यामुळे काम पूर्ण न केल्याने आज महाराष्ट्र व गुजरात या राज्यांचा तसेच कळवण व सुरगाणा या तालुक्याच्या आणि जवळपास १५ ते २० गावांचा संपर्क तुटला आहे. आजही या भागात पावसाचा जोर कायम असून, या रस्त्यावरील वाहतूक बंद झाली आहे. जिरवाडे शिवारातील पुलावर मुरूम मातीचा भराव करण्याचे काम सुरू आहे. हा भराव जिरवाडे शिवारातील शिवभांडणे रस्त्यावरून खासगी मालकाकडून आणला जात आहे. मात्र मुरुम आणण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर करण्याऐवजी ट्रकचा वापर केल्याने जिरवाडे -शिवभांडणे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्ता पूर्णपणे खचला असून, मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाहतुकीसाठी अडथळा ठरत आहे. हा रस्ता एक वर्षापूर्वी आदिवासी विकास विभागाच्या ठक्कर बाप्पा निधीतून तयार करण्यात आला होता. जिरवाडे शिवारातील पुलाचे काम सुरू असल्याने वाहतूक शिवभांडणे रस्त्याने सुरू होती, मात्र अवजड वाहनांनी रस्ता खराब केल्याने पर्यायी रस्ताही बंद झाला आहे. शेतकऱ्यांचा शेतमाल बाजार समितीपर्यंत आणता येत नाही . आदिवासी विद्यार्थ्यांना वाहने बंद झाल्याने पायपीट करण्याची वेळ आली आहे. रस्त्यांची दुरुस्ती संबंधित ठेकेदाराकडून करून घ्यावी अन्यथा कळवण आदिवासी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला पंचक्रोशीतील आदिवासी बांधवांसह टाळे ठोकू, असा इशारा कळवण पंचायत समितीचे सभापती मधुकर जाधव यांनी दिला आहे. (वार्ताहर)