नाशिक : जिल्हाधिकारी चांगले काम करतात, खालचे अधिकारी लक्ष घालीत नाहीत, म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनाच सर्व अधिकार देण्याचा विचार राज्य सरकार करीत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य महसूल अधिकाऱ्यांना चांगलेच झोंबले असून, शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम खालचे अधिकारीच करतात, जिल्हाधिकारी नव्हे असा युक्तिवाद करून यासंदर्भात महसूल अधिकारी संघटना मुख्यमंत्र्यांच्या विरोधात सक्रिय झाली आहे. शनिवारी यासंदर्भात सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करीत अनेक संदेश व्हायरल झाले आहेत. पुणे येथे विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांच्या राज्यस्तरीय बैठकीचा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आला. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या कामाचे कौतुक करून मुख्यमंत्र्यांनी खालच्या अधिकाऱ्यांना म्हणजेच तलाठी ते अपर जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या कामकाजावर अप्रत्यक्ष अविश्वासच व्यक्त केल्याची भावना बोलून दाखविली जात आहे. मुळात जिल्हाधिकाऱ्यांकडे फक्त नियंत्रणाची व देखरेखीची महत्त्वाची जबाबदारी असून, हाताखालचे अधिकारीच शासकीय योजना व कामांचा सातत्याने पाठपुरावा व प्रत्यक्ष योजनापूर्ती करीत असतात. अनेक जिल्हाधिकाऱ्यांना तर त्या त्या विषयांचे पुरेसे ज्ञानही नसते. अशा परिस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांनाच चांगल्या कामाचे सारे श्रेय देणे म्हणजे अन्य यंत्रणा कामचुकार असल्याचा निष्कर्ष काढण्यासारखे होईल, अशी प्रतिक्रिया महसूल अधिकारी देऊ लागले आहेत. एकटे जिल्हाधिकारी काहीच करू शकत नाही, त्यांच्या मर्यादा शासनालाही ठाऊक आहेत किंबहुना तसा प्रयत्न करून पाहावा, अशी आव्हानाची भाषाही अधिकारी बोलू लागले आहेत. (प्रतिनिधी)
मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर महसूल अधिकारी नाराज
By admin | Updated: January 31, 2016 00:09 IST