येवला प्रांताधिकाऱ्यांविरुद्ध दोन महिला तलाठ्यांनी जाहीरपणे विनयभंग व लाचेची तक्रार केली. विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. बदली हे एक कारण त्यामागे आहे. पण महसूल विभागांतर्गत खदखद आणि विशेष म्हणजे पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात असे घडणे चिंताजनक आहे.
माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांच्या लाच प्रकरणाने एकूणच शिक्षण व्यवस्थेची अब्रू चव्हाट्यावर आणली आहे. वीस टक्के अनुदान मिळालेल्या शाळांमधील शिक्षकांकडून ही लाच मागितली गेली. मुळात २० टक्के अनुदान मिळण्यासाठी या शाळा व शिक्षकांना किती तरी वर्षे वाट पाहावी लागली. आता अनुदान मिळाले तर ती लागू करण्यासाठी लाच द्यावी लागली. मध्यस्थ म्हणून शिक्षकच आहे. आता शिक्षक आमदार आणि शिक्षक, मुख्याध्यापक संघटनांना उपरती झाली. नव्या अधिकाऱ्यांचा सत्कार करणार नाही, अशा अधिकाऱ्यांविरुद्ध लढा उभारू अशी भूमिका घेतली गेली. डोक्यावरून पाणी गेल्यावर घेतलेली आक्रमकता अर्थशून्य असते, हे समजून घ्यायला हवे. साप गेल्यावर भुई धोपटण्याचा हा प्रकार आहे.