नाशिक : नाशिक तालुक्यातील ६६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत गुरुवारी (दि. २८) रोजी तहसील कार्यालयात काढण्यात आली. त्यानुसार तालुक्यातील ३४ ग्रामपंचायती या सर्वसाधारण वर्गासाठी तर उर्वरित ३२ ग्रामपंचायती या अनुसूचित जमाती आणि ओबीसींसाठी जाहीर झाल्या आहेत. नुकत्याच निवडणुका झालेल्या ३५ ग्रामपंचायतींपैकी १८ ग्रामपंचायती या सर्वसाधारण तर उर्वरित १६ ग्रामपंचायती या राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील ८१० ग्रामपंचायतींसाठी ११ तालुक्यांमधील सरपंचपदासाठीची आरक्षण सोडत तालुका पातळीवर काढण्यात आली. तहसीलदार अनिल दौंड यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक तहसील कार्यालयात सकाळी ११ वाजता आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. त्यानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व ओबीसीसाठी ३२ ग्रामपंचायतींसाठी आरक्षण पडले. तर उर्वरित ३४ ग्रामपंचायती सर्वसाधारण वर्गासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. नुकत्याच निवडणुका झालेल्या आणि पुढील दोन महिन्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठीचे आरक्षण सोडतीनुसार जाहीर करण्यात आले आहे. तालुक्यात ३२ ग्रामपंचायती या पेसा अंतर्गत असून उर्वरित ३४ ग्रामपंचायतींचे आरक्षण काढण्यात आलेले आहे.
गेल्या १५ जानेवारी रोजी तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. यंदा सरपंचपद हे सदस्यांमधून जाहीर केले जाणार असल्याने तालुक्यातील सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागून होते. त्यानुसार सोडतीचीही प्रक्रिया पार पडली असून ३५ ग्रामपंचायतींपैकी अनुसूचित जातिसाठी ३, अनुसूचित जमातीसाठी ४ व ओबीसींसाठी ९ असे एकूण १६ ग्रामपंचायतीचे सरपंचपद राखीव आहेत. तर उर्वरित १८ ग्रामपंचायतींचे सरपंचपद हे सर्वसाधारण वर्गासाठी खुले जाहीर झाले आहे. नागलवाडी ही ग्रामपंचायत पेसामध्ये गेल्याने तिची आरक्षण सोडत निघाली नाही. सन २०११ च्या जनगणनेसार तसेच उतरत्या क्रमाने रोटेशननुसार सरपंचपदाची आारक्षण सोडत जाहीर करण्यात आली.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर त्यांनी सदस्यांमधून सरपंच निवडीची प्रक्रिया राबविली जाईल, असे जाहीर केल्याने सरपंचपदाच्या निवडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आता सरपंचपदाचे आरक्षण पडल्याने राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापणार असून राजकीय हालचालींना लागलीच सुरुवातही झाली आहे. आरक्षणाची सोडत निघताच संभाव्य सरपंचपदाच्या नावांचीही चर्चा सुरू झाली आहे.
--इन्फो--
येत्या ३ तारखेला महिला सरपंचपदासाठीचे आरक्षण सोडतदेखील काढले जाणार होते. परंतु ३ फेब्रवारीला जिल्ह्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दौऱ्यावर असल्याने सोडत पुढे ढकलेली जाण्याची शक्यता आहे.
--इन्फो--
ग्रामपंचायतनिहाय आरक्षण
अनुसूचित जाती : संसरी, मांडसांगवी, बेतलगव्हाण,
अनुसूचित जमाती: लहवित, कोटमगाव, शिलापूर, चांदगिरीओ
ओबीसी: एकलहरे, विंचूरगवळी, मोहगाव, हिंगणवेढे, पिंप्री सैय्यद,लाखलगाव, कालवी, शेवगेदारणा, रायगड
सर्वसाधारण वर्ग: सामनगाव, यशवंतनगर, बेलगावढगा, विल्होळी, शिंदे, गौळाणे, लोहशिंगवे, ओढा, राहुरी, जाखुरी, पळसे, मातोरी, आंबेबाहुला, मुंगसरे, वंजारवाडी, नाणेगाव, दोनवाडे, तिरडशेत