नाशिक : शहरात पाणीकपात सुरू झाल्यानंतर लगेचच जिल्ह्यात मालेगाव, बागलाण, निफाड, देवळा यांसह बहुतांश तालुक्यांत पावसाने सोमवारी (दि.७) जोरदार हजेरी लावल्याने खरिपाच्या खोळंबलेल्या पेरण्यांना वेग येण्याची चिन्हे आहेत. सोमवारी सकाळपर्यंत मात्र केवळ इगतपुरी तालुक्यातच पावसाची हजेरी लागली होती.त्र्यंबकेश्वर : नेहमीच्या अनुभवाप्रमाणे मृग नक्षत्रात थोडाफार पाऊस पडतो, पण आर्द्रा हे नक्षत्र पूर्णत: पावसाचे असून, या नक्षत्रात पावसाचे प्रमाण भरभरून राहते. पण यावर्षी तब्बल एक महिन्यात पावसाचा मागमूस नाही. दोन नक्षत्रे कोरडी गेली. आज मात्र सायंकाळी सव्वापाच ते साडेसहापर्यंत पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली. निफाड : पावसाने तब्बल एक महिना उशिराने म्हणजे ७ जुलैला निफाड व परिसरात सायंकाळच्या सुमारास जवळ जवळ दोन तास हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.सायंकाळी ४च्या सुमारास पावसाने निफाड, जळगाव, काथरगाव, कोठुरे, कुरूडगाव, कोळवाडी, शिवरे, सोनेवाडी, उगाव, शिवडी, खेडे आदिंसह इतर गावांमध्ये चांगली हजेरी लावली. सायंकाळी ६ च्या सुमारास मात्र मुसळधार पावसाने निफाड शहराला चांगलेच झोडपल्याने निफाडमधील रस्त्यावरून पाणी वाहत होते. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.सटाणा : शहरासह तालुक्यात सोमवारी पावसाने दमदार हजेरी लावली. सुमारे पाऊण तास झालेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला असून खरीपाच्या पेरणीला गती मिळणार आहे. सोमवारी सकाळपासूनच वातावरणात कमालीचा उकाडा निर्माण झाला होता. काल दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास वादळ सुटले त्यानंतर मुसळधार पावसाला सुरूवात झाली. सटाण्यासह लखमापूर, ब्राह्मणगाव, शेमळी, आराई, औंदाणे, भाक्षी, मुळाणे, तरसाळी, वीरगाव, वनोलीसह कोटबेल, बिजोटे, रातीर, कऱ्हे येथे पाऊण तास पाऊस झाला.