नाशिक : आदिवासी विकास महामंडळ व शबरी विकास महामंडळातील नोकर भरतीच्या कथित घोटाळ्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची बदली अटळ असल्याचे बोलले जात असून, यासंदर्भात खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी भरती घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्याकडे केली आहे.आदिवासी व शबरी विकास महामंडळांतर्गत ५८४ पदांसाठी झालेल्या नोेकर भरतीत ३०० कोटींचा भ्रष्टाचार झाला असून, या नोकर भरतीची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लागलीच याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश आदिवासी विकास विभागाला दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा यांच्या अध्यक्षतेखाली समितीही नियुक्त करण्यात आली होती. त्याच दरम्यान शुक्रवारी (दि.२२) रात्री अचानक आदिवासी विकास विभागात आग लागून त्यात काही संगणक जळाले. भरती घोटाळ्यातील चौकशी सुरू होण्यापूर्वीच हे जळीतकांड घडल्याने त्याचा भरती घोटाळ्याशी संबंध असून, तो पुरावा नष्ट करण्याचाच एक भाग असल्याचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी दुसऱ्या दिवशी या जळीतकांडाची पाहणी करताना आरोप केला होता. (प्रतिनिधी)
अधिकाऱ्यांना भोवणार भरती घोटाळा
By admin | Updated: April 24, 2016 23:53 IST