नाशिक : सहकारी संस्थांचे काम अधिक सक्षमपणे होण्यासाठी लवकरच संगणकीकरणावर भर देण्यात येणार असून, कर्ज परतफेड न करणाऱ्या पतसंस्थांच्या संचालकांच्या मालमत्तांवर बोजा चढवून वसुली करावी, असे निर्देश राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी सहकारी संस्थांच्या आढावा बैठकीत बोलताना दिले.नाशिक विभागातील सहकारी संस्थांच्या आढावा बैठकीत बोलताना पाटील यांनी सांगितले, बुडीत पतसंस्थांच्या संचालकांकडून वसुली करण्यासाठी एक कृती आराखडा तयार करून त्यानुसार तातडीने कार्यवाही करावी. जिल्हा मध्यवर्ती बॅँकेने अधिक सक्षम होण्यासाठी सभासद संख्या वाढविणे व पीककर्ज पुनर्गठणावर भर देणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी त्याला कर्ज उपलब्ध करून देणे हा जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचा गाभा आहे. तसेच राष्ट्रीयकृत बॅँकांनीदेखील शेतकऱ्यांबाबत सहकार्याची भूमिका घेणे गरजेचे आहे.कर्ज वाटपासाठी राष्ट्रीयकृत बॅँका प्रतिसाद देत नसल्यास त्यांची स्वतंत्र बैठक घेण्यात यावी, असेही पाटील यांनी सांगितले. कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार असल्याने शेती आणि शेतकरी समृद्ध करण्याचा प्रयत्न सहकार विभागामार्फत करण्यात येत आहे, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पाटील यांनी नाशिक विभागातील मंजूर भरलेली पदे व रिक्त पदांची माहिती घेतली. शेती कर्जवाटपातील बॅँकेच्या अडचणी व उपाययोजना यावरही त्यांनी चर्चा केली. तसेच तालुकानिहाय पीककर्ज मेळावे घेऊन सुलभ पीककर्ज वाटप योजनेची माहिती देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव, एम. डी. पाटील यांच्यासह पाचही जिल्ह्यांचे जिल्हा उपनिबंधक व जिल्हा विशेष लेखा परीक्षक, सहायक निबंधक उपस्थित होते.
कर्ज परतफेड न करणाऱ्या पतसंस्था संचालकांंकडून वसुली
By admin | Updated: September 16, 2016 23:45 IST