कळवण : सप्तशृंगगडावर चैत्रोत्सवासाठी आलेल्या एका भाविकाचा उष्माघाताने मृत्यू झाला. वना रामदास भिल्ल (६२) असे मृताचे नाव असून, ते जळगाव जिल्ह्यातील रावेर येथील रहिवासी आहेत. सप्तशृंगी निवासिनी देवीचा चैत्रोत्सव सध्या सुरू आहे. यात अनेक भाविक अनवाणी येतात. रावेर येथील वना भिल्ल हे देवीच्या दर्शनाला आले होते. दर्शनासाठी जात असताना त्यांना नांदुरी ते सप्तशृंगगड यादरम्यान अचानक चक्कर आली. त्यांच्या नातेवाइकांनी रुग्णवाहिका बोलावली व त्यांना कळवण येथील सरकारी उपजिल्हा रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. सदरचा प्रकार वातावरणातील अतिउष्णतेमुळे घडल्याचे बोलले जात आहे. मात्र पोलीस प्रशासनाकडे याची कोणतीही नोंद नाही. न्यासाच्या वतीने चैत्र यात्रा २०१६साठी येणाऱ्या सर्व भाविक व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दोन कोटी रु पयांचा जनसुरक्षा विमा उतरविलेला आहे. या माध्यमातून मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना कायदेशीर पूर्ततेनंतर एक लाखाची मदत मिळू शकते. मात्र मृत्यूची नोंदच नसेल तर मदत कोणत्या आधारावर करायची, हा प्रश्न आहे. रणरणत्या उन्हाची तमा न बाळगता शेकडो किलोमीटर मजल दरमजल करीत अनवाणी येणाऱ्या देवीभक्तांच्या संख्येत यंदा वाढत्या तपमानामुळे घट झाली आहे. (वार्ताहर)
सप्तशृंगगडावर रावेरच्या भाविकाचा उष्माघाताने मृत्यू
By admin | Updated: April 20, 2016 00:19 IST