पांढुर्ली : गाव व परिसरात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. जून महिना संपत आला असतानाही अद्याप पाऊस झाला नसल्याने गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या उद्भव विहिरीने तळ गाठल्याने येथील पूरक नळ पाणीपुरवठा योजना अडचणीत सापडली आहे. येथील ग्रामपंचायतीच्या वतीने दारणा नदीकाठावर उद्भव विहिरी खोदून तेथून जलवाहिनीद्वारे गावातील जलकुंभात पाणी टाकले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून गावाला पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली नव्हती. मात्र यंदा पावसाने ओढ दिल्याने ही परिस्थीती ओढवली असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. येथे गेल्या पाच दिवसांपासून नळांना पाणी आले नसल्याने महिलावर्गाची भटकंती सुरू झाली आहे. जून महिना संपण्यासाठी केवळ चारच दिवस शिल्लक आहेत. पावसाचे रोहिणी, मृग हे दोन्ही नक्षत्र कोरडी गेली आहेत.दारणा नदीत कडवा धरणाचे पाणी सोडण्यात येते. त्यामुळे नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठ्याच्या विहिरींना पाणी येते. मात्र गेल्या काही दिवसांपासून कडवा तसेच दारणा धरणातून पाणी सोडण्यात येत नसल्याने विहीर आटली आहे. त्यामुळे पांढुर्ली येथील नळपाणी योजना धोक्यात सापडली आहे.गावात अन्य पाण्याचे स्रोत नसल्याने महिलावर्गाचे हाल होत आहे. गावात पंचायत समितीच्या वतीने विंधनविहिरी घेण्यात आल्या असल्याने त्या पाण्यावर धुणी- भांडीची कामे उरकली जातात. मात्र पिण्याच्या पाण्यासाठी काय उपाययोजना करावी, असा प्रश्न ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना पडला असून, ग्रामस्थांनाही पाणी कोठून आणावे या प्रश्नाने सतावले आहे. पाटबंधारे विभागाने कडवा व दारणा धरणातून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. (वार्ताहर)