नाशिक : गेल्या महिनाभरापासून दडी मारलेल्या पावसाने शनिवारी सायंकाळी शहरात अर्धा ते पाऊण तास दमदार हजेरी लावली. पावसामुळे रस्त्यावरून पहिल्यांदाच या मोसमात पाणी वाहू लागल्याचे चित्र होते. दिवसभरात जिल्ह्यातही कमी-अधिक स्वरूपात पावसाने हजेरी लावल्याचे वृत्त आहे.आर्द्रा नक्षत्राच्या अंतिम चरणात पावसाने काही प्रमाणात का होईना, शेवटी शेवटी काही वेळापुरता दमदार हजेरी लावली. शनिवारी सकाळपासूनच शहरात ढगाळ हवामान होते. सकाळी साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास काही भागात तुरळक स्वरूपात पावसाने हजेरी लावली. त्यानंतर स्वच्छ सूर्यप्रकाश पडला. दुपारनंतर मात्र पुन्हा आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शहरात सर्वत्र पावसाने जोरदार हजेरी लावली. सुमारे अर्धा ते पाऊण तास दमदार पाऊस बरसला. अचानक आलेल्या पावसामुळे चाकरमान्यांची व शाळेतून घरी निघालेल्या विद्यार्थ्यांची तारांबळ उडाल्याचे चित्र होते. खरिपाच्या पेरण्यांसाठी अजूनही दमदार पावसाची अपेक्षा आहे. (प्रतिनिधी)
आर्द्रा बरसल्या
By admin | Updated: July 3, 2016 00:18 IST