लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने शनिवारी काही प्रमाणात विश्रांती घेतल्याने दुथडी भरून वाहणाऱ्या गोदावरीचे पाणी ओसरले आहे. त्याचबरोबर दिवसभरात अधूनमधून दिलेल्या उघडिपीमुळे सकाळी शहरवासीयांना तीन दिवसांनंतर सूर्यदर्शन झाले. शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात ७७७ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. यात सर्वाधिक पाऊस पेठ तालुक्यात १६८ मिलिमीटर इतका नोंदविला गेला, त्याखालोखाल इगतपुरी १४५ मिलिमीटर, त्र्यंबकेश्वर ११८, सुरगाणा ९० व नाशिक ६३ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. मालेगाव, नांदगाव व येवल्याला मात्र अल्प हजेरी लावली. शनिवारच्या पावसामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नद्या, नाल्यांच्या पातळीत वाढ होऊन पूरपरिस्थिती निर्माण झाली. नाशिक शहर व गंगापूर धरण क्षेत्रात झालेल्या तुफान पावसाने गोदावरी नदीला पूर आला तर नासर्डी, वाघाडी नाल्यांनाही पाणी आल्याने रामकुंड परिसरात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. शनिवारी मात्र पावसाचा काहीसा जोर ओसरल्याने गोदावरी पूर्वपदावर आली. गंगापूरमध्ये मुबलक साठानाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ७५ टक्के इतका पाणी साठा झाला आहे. शनिवारी रात्री त्र्यंबकेश्वरला झालेल्या पावसामुळे ही वाढ झाल्याचे पाटबंधारे खात्याने सांगितले. धरणाची पाणी साठवणुकीची क्षमता पाहता ५३६४ दशलक्ष घनफूट इतके पाणी धरणात साठले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत ही वाढ लक्षणीय आहे. धरणातील वाढ ८५ टक्क्याच्या पुढे गेल्यास पाणी सोडण्याचा निर्णय घ्यावा लागणार आहे.
पावसाचा जोर ओसरला
By admin | Updated: July 16, 2017 00:30 IST