येवला : भाजपाच्या येथील शिष्टमंडळाने केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांची दिल्लीत भेट घेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या. त्यांच्याशी ५५ मिनिटे चर्चा करताना शिष्टमंडळाने विविध मागण्या माडल्या.कांदा उत्पादक शेतकऱ्याना कांद्याचा ३००० रुपये हमीभाव देण्यात यावा, कांदा उत्पादन खर्च महाग झाल्याचे लक्षात घेऊन कांद्यावरील निर्यातशुल्क शून्य करण्यात यावे, निर्यातमूल्य प्रत्येक वेळेस बदल्याने ना शेतकऱ्यांचा फायदा होतो ना घरघुती ग्राहकांचा. फायदा फक्त व्यापाऱ्यांचा होतो. याबाबत उपाययोजना करावी, कांद्याला ताबडतोब जीवनावश्यक वस्तूतून वगळण्यात यावे आदि मागण्यांचा त्यात समावेश आहे. या मागण्यांबाबत चर्चा करताना कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी कृषी खात्याचे विभाजन झाले असल्या कारणाने निर्णय प्रक्रि येस वेळ लागत असल्याचे नमूद केले.मागण्या संदर्भात कृषिखात्यासह अन्न व पुरवठा खाते, वाणिज्य खाते, मंत्र्यांची बैठक घेऊन योग्य निर्णय घेऊ, निर्णयात कांदे उत्पादक शेतकऱ्यांंच्या नुकसानीचा व तोट्याचा विचार केला जाईल, अशी हमी दिली. आगामी काळात पंतप्रधान ग्रामसडक योजना राबवून शहरी, ग्रामीण व दुर्गम भागांत रस्त्यांचे जाळे तयार करून ग्रामीण भागातील दळण -वळण गतिमान करू, नियोजित ग्राम सिंचन योजना तयार असून, देशातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात पाणी पोहचणार आहे. त्यामुळे शेतकरी समृद्ध होतील, अशी माहिती सिंह यांनी दिली. आगामी काळात कांदा, टमाटे, बटाटे या पिकांसाठी धोरण ठरवून नुकसान व फसवणुकीला प्रतिबंध घालण्यात येणार असल्याचे नियोजन आहे, असे देखील त्यांनी नमूद केले. या शिष्टमंडळाने खासदार राजू शेट्टी यांचीही भेट घेतली. (वार्ताहर)
कांद्याचा प्रश्न दिल्ली दरबारी
By admin | Updated: July 14, 2014 00:29 IST