नाशिक : तोंडावर निवडणूक येऊन ठेपलेल्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाची जुनी मतदार यादी रद्द करून नवीन मतदार यादी तयार करण्याचे काम वास्तवात अवघड असल्याचे मान्य करीत, केंद्रीय निवडणूक आयोग याप्रश्नी काय भूमिका घेते त्यावरच सारे अवलंबून असल्याच्या प्रतिक्रिया या निवडणुकीच्या रिंगणात उतरू पाहणाऱ्या उमेदवारांनी व्यक्त केल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाची मतदार यादी कायद्यानुसार नवीन करण्यात यावी, असे पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले आहे. मात्र राज्यात नाशिक व अमरावती विभागात नोव्हेंबरपूर्वीच निवडणूक होणार असल्याने या मतदारसंघासाठी नवीन मतदार यादी तयार करणे काहीसे अडचणीचे आहे. मुळात जुन्या मतदार यादीच्या आधारे राजकीय पक्ष व त्यांच्या उमेदवारांनी गेल्या काही महिन्यांपासून प्रचार सुरू केला असून, जवळपास पन्नास टक्क्याहून अधिक मतदारांशी संपर्कही साधण्यात आला आहे. निवडणुकीला दीड महिन्याचा कालावधी शिल्लक असताना अचानक मतदार यादी बदलली तर त्याचा प्रचारावर काहीसा परिणाम होऊ शकतो, असे मत राजकीय पक्षांनी व उमेदवारांनी व्यक्त केले आहे, मात्र यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोग काय भूमिका घेतात त्यावरच पुढील चित्र स्पष्ट होईल, असे मतही व्यक्त करण्यात आले आहे. जुन्या मतदार यादीतील जवळपास ६० मतदारांचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही. बोगस मतदानाच्या दृष्टीने ते घातक असल्याची तक्रारही करण्यात आली आहे.
नवीन मतदार यादीच्या अडचणी पक्षांनाही मान्य
By admin | Updated: September 13, 2016 01:14 IST