सिन्नर : तालुक्यातील पांगरी येथील संत हरिबाबा विद्यालयाच्या वतीने सीमेवरील जवानांना लोकमतच्या ‘रक्षाबंधन वीर जवानांसाठी’ या उपक्रमाअंतर्गत २५० राख्या सुपुर्द करण्यात आल्या. देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर अहोरात्र सज्ज असलेल्या जवानांना राख्या पाठविण्याचा उपक्रम लोकमतने सुरू केला असून, त्या आवाहनाला विद्यालयातील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनींनी उर्त्स्फूत प्रतिसाद देत २५० राख्या जमा केल्या. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती निर्माण व्हावी, देशाभिमान वृद्धिंगत व्हावा तसेच भारतीय संस्कृतीची जपवणूक विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी हा त्यामागचा उद्देश आहे. रक्षाबंधन असो की भाऊबीज या बहीण-भावाच्या नात्याची गुंफण अधिक बळकट करणाऱ्या उत्सवांसाठी घरी येण्याची संधी सीमेवर भारत मातेचे रक्षण करणाऱ्या जवानांना मिळत नाही. हे आनंदाचे क्षण नातेवाइकांबरोबर घालविण्याचा योग त्यांना येत नाही. मात्र देशवासीयांकडून भेट म्हणून दिल्या जाणाऱ्या राख्या त्यांच्यापर्यंत पोहोचविल्यास जवानांचा उर अभिमानाने भरून येतो. देश रक्षणाच्या ध्येयाने पछाडलेल्या जवानांना केवळ मायेची ऊब हवी असते. रक्षाबंधनासारख्या लोकमतच्या उपक्रमात विद्यालयाने भाग घेतल्याचा आनंद झाल्याची माहिती मुख्याध्यापक सुधाकर कोकाटे यांनी दिली. याप्रसंगी पर्यवेक्षक आर. व्ही. रोहमारे, गणेश गायकवाड, स्वप्नील जाधव, गणेश पगार, के. आर. सोनवणे, जी. यू. नाठे, एस. एस. मुदगुल, श्रीमती के. एम. गीत, व्ही. के. पगार आदिंसह शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)
पांगरी विद्यालयाकडून सैनिकांना राख्या
By admin | Updated: August 9, 2014 00:48 IST