नाशिक : पिंपळगावच्या एका व्यापाऱ्याचे खंडणीसाठी अपहरण केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या आठ संशयिताना निफाड सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या तपासी अधिकाऱ्यांच्या तपासपद्धतीवर नाराजी व्यक्त करत न्यायालयाने महासंचालकांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहे.पिंपळगावचे व्यापारी शंकर मूलजी ठक्कर यांचे १९ डिसेंबर २०१२ साली खंडणी वसुलीसाठी आरोपींनी कांद्याच्या चाळीमधून अपहरण केले होते. ठक्कर यांचा भाऊ करसन यांच्याकडे पंधरा कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी आरोपींनी फोनवरून केली होती. खंडणीची रक्कम न दिल्यास भावाला ठार मारण्याची धमकी दिली होती. ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून खरशिंदे (नगर) गावातच पाच कोटीच्या रोकडसह एकूण अकरा संशयित आरोपींना अटक केली होती. याप्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात अकरा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.या खटल्याची सुनावणी निफाड सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. जे. मंत्री यांच्या समोर झाली. या खटल्यासाठी सरकारने विशेष सरकारी वकील अॅड. अजय मिसर यांची नियुक्ती केली होती. त्यांनी सरकारी पक्षातर्फे २१ साक्षीदार तपासले. त्यात आरोपींविरूद्ध सबळ पुरावा उपलब्ध झाल्याने न्यायालयाने आठही आरोपींना जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यातील तीन संशयितांना न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. मिसर यांना अॅड. सुरेश गायकवाड यांनी सहकार्य केले. पाच कोटी देऊन तडजोडआरोपींशी तडजोड करून ठक्कर यांनी पाच कोटी रुपयांची खंडणीची रक्कम निश्चित केली होती, मात्र गुन्ह्णाचे गांभीर्य बघता तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपींचा माग काढला; मात्र तत्पूर्वी करसन याने भावाची सुटका करण्यासाठी आरोपींना खरशिंदे शिवारात पाच कोटी रुपयांची रक्कम दिली होती. त्यावेळी आरोपींनी शंकरला करसनकडे सोपविले मात्र शंकरच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा होत्या, हाच मोठा पुरावा ठरला. संभाषणावरून मिळाले लोकेशनआरोपींनी फिर्यादी करसनसोबत भ्रमणध्वनीवरून वेळोवेळी केलेल्या संभाषणावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मोबाइल टॉवर लोकेशन घेऊन आरोपींचा माग काढला. पोलिसांना यामध्ये यश आले आणि खरशिंदे गावातून पसार होण्याअगोदरच पोलिसांनी आठ आरोपींच्या रोकडसह मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात अग्निशस्त्रे, काडतुसे, चिलखत, अनेक मोबाइल पोलिसांनी जप्त केले होते.असे आहे शिक्षेचे स्वरूप न्यायालयाने आठही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. कलम ३८६अन्वये पाच वर्षांची सक्तमजुरी व प्रत्येकी पाचशे रुपये दंड, कलम ५०६ अन्वये तीन वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी तीनशे रुपये दंड, कलम ३९५ व ३९७ अन्वये दहा वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी सातशे रुपये दंड, कलम ३४७ अन्वये तीन वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी तीनशे रुपये दंड, कलम १२०(ब)नुसार शिक्षा सुनावली आहे.यांना झाली शिक्षासचिन दामोदर पाटील (२५), तुषार विक्रम बैरागी (२०) (दोघे रा. पिंपळगाव), मुलानी दाऊन हुसेन (२१, रा. पाचोरे वणी), सागर विजय गवळी (२१, रा. बेहेड), अर्जुन मधुकर रहाणे (२५, रा. सुकेणे), योगेश दौलत गडाख (२१, रा. पाचोरे वणी), संतोष मनोहर हतांगळे (२५, रा. शांतीनगर) विश्वजित ऊर्फ सोनू किरण थेटे (२४, रा. शिवाजीनगर) या आठ आरोपींविरुद्ध खंडणी वसुलीसाठी अपहरण व मारहाणीचे गुन्हे सिद्ध झाल्याने न्यायालयाने त्यांना विविध गुन्ह्णांमध्ये जन्मठेप व सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. यांची झाली निर्दोष सुटकाया गुन्ह्यात पोलिसांनी अटक केलेले संशयित सुनील भाऊराव पिठे (१९), कोंडाजी चंद्रभान वाडेकर (२१), बाळासाहेब भागवत वाडेकर (२४) यांच्याविरुद्ध न्यायालयाला सबळ पुरावे आढळून न आल्याने सत्र न्यायालयाने या तिघा संशयितांची निर्दोेष सुटका केली आहे. लहान गुन्हेगारी क्षेत्रात खंडणी वसुलीसाठी व्यापाऱ्यांच्या मुलांचे अपहरण करणे, तसेच धारदार शस्त्राचा धाक दाखवून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे यासारखे गुन्हे वाढत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरत आहे. न्यायालयाने दिलेल्या या निकालामुळे अशा प्रकारच्या गुन्हेगारीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होईल. पोलिसांनी गुन्ह्यांचा गांभीर्याने सखोल तपास करण्यावर भर देण्याची गरज आहे.- अॅड. अजय मिसर, विशेष सरकारी वकील
पिंपळगाव (ब) : कांदा व्यापाऱ्याचे अपहरण प्रकरण
By admin | Updated: August 24, 2016 01:10 IST