येवला : भीषण दुष्काळ परिस्थिती असताना बोकटे येथील जागृत देवस्थान श्री कालभैरवनाथ महाराज यात्रेसाठी सुमारे ४ ते ५ लाख भाविकांनी दर्शन घेतले. बिकट पाणीप्रश्नावर बोकटेकरांनी मात करीत समाजसेवी संस्थांसह दानशूरांना मदतीचे आवाहन करीत भाविकांना पाण्यासह सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या.गेल्या ३५ वर्षापासून पालखेड धरणातील पाणी हे यात्रेसाठी आरक्षित असते. पण यंदा भीषण पाणीटंचाई असल्याने जिल्हाधिकारी व पालखेड प्रशासनाने पाणी पुरवण्यास असमर्थता दाखवली होती. त्यामुळे बोकटेकरांसाठी यात्रेदरम्यान खरे आव्हान पाण्याचे होते. एवढ्या भीषण दुष्काळी परिस्थितीत दररोज येणाऱ्या ६० ते ७० हजार भविकांना पाणी कसे पुरवावे? काही तरी चमत्कार होईल अन सगळ्या यात्रेचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न कसा सुटेल.सर्व गावकऱ्यांनी हा प्रश्न सोडला तो श्री कालभैरवनाथाच्या भरवश्यावर. येवला पंचायत समितीचे माजी सभापती महेंद्र काले, बापूसाहेब काळे, रामदास काळे, राजेश मोरे, रावसाहेब लासुरे, प्रताप दाभाडे, पोपटराव दाभाडे, माणिकराव दाभाडे, पोपटराव खामकर, केशवराव दाभाडे, सखाहरी दाभाडे, विजय दाभाडे, गोपीचंद दाभाडे व सहकाऱ्यांनी हा प्रश्न सोडवला. सर्व क्षेत्रातील नेते, सामाजिक कार्यकर्ते, सेवाभावी संस्था, ट्रस्टी या सर्वांना भेटून त्यांना यात्रेचे महत्त्व पटवून दिले. देवळाणे, दुगलगाव व इतर वाडी वस्ती ठिकाणी पाणी टॅँकर पाठवण्यात आले. सर्व समाज सेवकांचा, सेवाभावी संस्थांचा, ट्रस्टी, संजीवन समूह यांनी पाणीपुरवठा केला तसेच जिल्हास्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त गावचे ग्रामसेवक सचिन पवार, सरपंच साधना काले, उपसरपंच प्रतापभाऊ दाभाडे, सर्व सदस्य व सर्व स्वयंसेवकांनी परिश्रम घेऊन यात्रा नियोजनास व मंदिर कामास मदत केली. ग्रामस्थांनी या कामासाठी अथक परिश्रम घेतले. सन १९८१ पासून पालखेड डाव्या कालव्याच्या आवर्तनाने यात्रेसाठी पाणी दिले जाते. परंतु तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पालखेड प्रशासन बोकटे यात्रेसाठी पाणी देण्यास असमर्थ ठरले आहे. यामुळे भाविकांची तहान भागविण्यासाठी ग्रामपंचायतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत निवासी अप्पर जिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनीदेखील खुले आवाहन केले होते. या प्रतिसाद देऊन नाशिक येथील सत्य साईबाबा ट्रस्टने ३० टँकर पाणी दिले. कांदा व्यापारी नंदकिशोर आट्टल यांनी ११ टँकर, संजीवनी साखर कारखान्याचे अध्यक्ष बिपीन दादा कोल्हे, माजी पंचायत समिती सभापती महेंद्र काले यांच्यासह काही व्यापारी मंडळींनी बोकटे यात्रेसाठी पाणी टँकर पुरवले. बोकटे यात्रेसाठी व्यवस्थापनात संतोष खामकर, धोंडीराम खामकर, गोरख दाभाडे दिगंबर भागवत, सोपान बागल, हरिभाऊ जगताप, सचिन कळमकर, भैरवनाथ मित्रमंडळ, रायगड ग्रुप यांनी भरीव योगदान दिले. (वार्ताहर)
पाच लाख भाविकांचे दर्शन
By admin | Updated: May 4, 2016 23:45 IST