नाशिक : महापालिकेच्या घरकुल योजनेसाठी लाभपात्र व्यक्तींकडून त्यांच्या हिश्श्याची रक्कम घेण्यात आली; परंतु त्यांना अद्याप घरकुलांचे वाटप करण्यात आलेले नाही. त्यामुळे वंचित लाभपात्र व्यक्तींनी गुरुवारी दलित पॅँथरच्या नेतृत्वाखाली महापालिकेसमोर निदर्शने केली. येत्या दोन- तीन दिवसांत अपूर्ण घरकुले पूर्ण करून त्याचे वाटप करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी महापालिकेने दिले.पंचवटी विभागातील सावित्रीबाई फुलेनगर, वीटभट्टी, गणेशवाडी, अंबिकानगर, आरटीओ आॅफिससमोर येथील झोपडपट्टीवासीयांना घरकुले मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्नकेले.महापालिकेने त्यांचे पुरावे बघून त्यांना घरे देण्यास अनुकूलता दर्शविली. त्यानंतर पालिकेने त्यांच्याकडून १४ हजार २२२, तर काही वर्गाकडून १७ हजार ६०० रुपये याप्रमाणे लाभपात्र व्यक्तींचा हिस्सा घेण्यात आला आणि रीतसर पावत्या देण्यात आल्या. त्यानंतर निलगिरी बाग येथे घरकुल देण्याचे ठरविण्यात आले आणि सोडतही काढण्यात आली. परंतु चार महिने उलटून गेले तरी घरकुले देण्यात आलेली नाही. अशा प्रकारचे सुमारे ८० ते ९० लाभपात्र कुटुंबे असल्याचे सांगण्यात येते. सध्या ही कुटुंबे ज्या भागात राहतात तेथे पावसाचे पाणी साचले असून, त्यांना राहता येणे अशक्य झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांना तातडीने घरे मिळावी यासाठी दलित पॅँथरने निदर्शने केली. त्यानंतर सुरेश नेटावटे, विजय साळवे, रमेश नाईक, शिवाजी खरात, प्रशांत नाईक, रमेश आव्हाड, गोपाल यादव, लक्ष्मण खरात, हरिदास भालेराव यांनी उपआयुक्त रोहिदास बहिरम यांना निवेदन दिले. निलगिरी बाग येथील घरकुले त्वरित पूर्ण करून लवकरच ती वितरित करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
पैसे भरले, पण घरकुल मिळेना!
By admin | Updated: August 1, 2014 01:07 IST