नाशिक : गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे शहरासह जिल्ह्यातील वीज यंत्रणा कोलमडली असून, गोदावरी - दारणाच्या पातळीत वाढ झाल्याने नदीकाठच्या रहिवाशांचाही वीजपुरवठा सुरक्षेच्या कारणास्तव खंडित करण्यात आला होता, तर पंचवटी भागाला वीजपुरवठा करणाऱ्या भूमिगत मुख्य वाहिनीत बिघाड झाल्याने अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला होता. पंचवटीला वीजपुरवठा करणाऱ्या भूमिगत वीजवाहिनीत पावसामुळे बिघाड (इंटरप्शन) झाल्याने परिसरातील सुमारे १३ रोहित्रे बंद झाली. त्यामुळे पंचवटीतील मोठ्या परिसराचा वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत खंडित होता. १३पैकी नऊ रोहित्रे रात्री उशिरापर्यंत सुरू झाल्याने काही भागात वीजपुरवठा सुरळीत होता; मात्र कृष्णानगर परिसरात अंधाराचे साम्राज्य होते. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळले, तर द्वारका परिसराचाही वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. शहरासह जिल्ह्यातही पावसामुळे वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. खंडित वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज वितरण कंपनीकडून प्रयत्न केले जात असून, संततधारेमुळे कामात अडथळे येत होते. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत शहरातील पंचवटी, नदीकाठचा परिसर, तर जिल्ह्यातील काही भाग अंधारात होता. (प्रतिनिधी)
पावसामुळे पंचवटीच्या वीजवाहिनीत बिघाड
By admin | Updated: August 1, 2014 01:09 IST