पंचवटी : गेल्या अनेक महिन्यांपासून ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळविणाऱ्या पालेभाज्यांची आवक वाढल्याने भावात घट झाली आहे. पालेभाज्यांचे भाव उतरल्याने ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे. मागील दोन दिवसांपासून मेथी, शेपू तसेच कोथिंबीरची आवक वाढत चालल्याने भाव जवळपास निम्म्याने घसरल्याचे बाजार समितीच्या वतीने सांगण्यात आले. बाजार समितीत झालेल्या लिलावात मेथी ३५० रुपये शेकडा, शेपू ३०० रुपये, तर कोथिंबीर ५०० रुपये शेकडा दराने विक्री झाली. किरकोळ बाजारात कोथिंबीर पाच रुपये, मेथी पाच रुपये, तर शेपू दहा रुपये प्रति जुडी दराने विक्री होत आहे. काही दिवसांपूर्वी पालेभाज्यांच्या भावात वाढ झाल्याने ग्राहकांना प्रति जुडीसाठी २५ ते ३० रुपये मोजावे लागत होते. मात्र मागील दोन दिवसांपासून पालेभाज्यांचे भाव कमी झाल्याने ग्राहकांनी समाधान व्यक्त केले. पावसाने उघडीप दिल्याने आवक वाढत आहे. त्यातच शेतमाल काहीसा हलक्या प्रतीचा असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याने सांगण्यात आले आहे. आगामी कालावधीत पालेभाज्यांची आवक वाढली तर भावात आणखी घट होण्याची शक्यता बाजार समितीने वर्तविली आहे. (वार्ताहर)
पालेभाज्यांचे भाव उतरले; ग्राहकांत समाधान
By admin | Updated: August 20, 2014 00:42 IST