मालेगाव : शहर परिसरात गेल्या चार दिवसांपासून उष्णतेची लाट पसरली आहे. आग ओकणाऱ्या सूर्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मालेगावच्या पाऱ्याने चाळिशी पार केल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. गुरुवारचे तपमान ४२ अंश सेल्सिअस एवढे नोंदविले गेले.मालेगाव शहर व परिसरात उष्णतेने व उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. पाच-सहा दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. तपमानाने तब्बल चाळिशी पार केली आहे. राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे तपमान मालेगावचे नोंदवले गेले आहे. याचा थेट परिणाम जनजीवनावर झाला आहे. ग्रामीण भागातही दैनंदिन कामकाजावर विपरीत परिणाम झाला आहे. सकाळपासूनच उन्हाचे चटके बसू लागले आहेत. दुपारच्या सत्रात सूर्य अक्षरश: आग ओकीत असतो. या उन्हामुळे बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पसरला आहे. दुपारच्या सत्रात सर्वच प्रमुख रस्ते निर्मनुष्य होत आहेत. शासकीय व निमशासकीय कार्यालयांमधील कामकाजावरही उन्हाचा परिणाम दिसून येत आहे. उन्हामुळे शासकीय कार्यालयांमधील गर्दी ओसरली आहे. शहर- परिसरातील शाळा-महाविद्यालयेही सकाळच्या सत्रात भरवली जात आहेत. विद्यार्थ्यांना घराबाहेर सोडण्यास पालक नकार देत आहेत. नागरिकही महत्त्वाच्या कामानिमित्त घराबाहेर पडत आहेत. उन्हापासून बचाव करण्यासाठी शीतपेय व इतर उपाययोजनांचा आसरा घेतला जात आहे. शहरात रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी रसवंतीगृहे उभारण्यात आली आहेत. शहर परिसरातील झाडांचाही उन्हापासून बचाव करण्यासाठी उपयोग केला जात आहे. ग्रामीण भागातील जनजीवनही विस्कळीत झाले आहे.उन्हामुळे शेतातील उद्योगधंदे बंद पडले आहेत. मजूर व शेतकरी उन्हामुळे दुपारच्या सत्रात काम करीत नाहीत. तसेच या कडक उन्हामुळे शेती शिवारातील विहिरींच्या पाण्याच्या पातळीतही घट होत आहे. परिणामी नागरिकांना व जनावरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नाही. पाणीटंचाईचा सामना ग्रामीण भागातील जनतेला करावा लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंतीची वेळ आली आहे. मेंढपाळांनाही मेंढ्यांना पाणी कसे द्यावे, असा प्रश्न पडला आहे. दरम्यान, उन्हापासून बचाव करण्यासाठी शहरातील रस्त्यांवर टोपी, उपरणे, गॉगल्स आदि वस्तू विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. नागरिकांची खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे. (प्रतिनिधी)
उन्हाच्या प्रकोपाने जनजीवन विस्कळीत
By admin | Updated: March 30, 2017 22:55 IST