नाशिक : शहरातील बंद पाणपोर्इंबाबत लोकमतने वृत्त देताच शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली असून, पाणपोया त्वरित सुरू करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. महापालिका आयुक्तांनी पाणपोई सुरू न केल्यास बंद पडलेल्या आणि मृत अवस्थेत असलेल्या पाणपोर्इंना श्रद्धांजली अर्पण करण्यात येईल, असा इशाराच सेनेने दिला आहे.महापालिकेने पहिल्या दोन पंचवार्षिक कारकिर्दीत मोठ्या प्रमाणात पाणपोई बांधल्या. यानंतर त्यातील अनेक पाणपोई महापालिकेने अतिक्रमण विरोधी मोहिमेत उद्ध्वस्त केल्या असल्या काही पाणपोई मात्र जैसे थे आहेत. त्यांची अवस्था बिकट झाली आहे. एकीकडे शहरात तपमान चाळीस अंशांच्या पलीकडे जात असल्याने गंभीर परिस्थिती असून, दुसरीकडे मात्र पांथस्थांना पाणीही उपलब्ध नाही अशी अवस्था आहे. या पार्श्वभूमीवर लोकमतने तहानलेल्या पाणपोई असे सचित्र वृत्त दिल्यानंतर शिवसेनेच्या वतीने युवा सेना जिल्हा समन्वयक सचिन बांडे, उमेश चव्हाण, सुनील जाधव, राजेंद्र क्षीरसागर, नाना काळे, जयदीप सूर्यवंशी, सतीश अहिरे, संजय चिंचोरे तसेच संजय परदेशी यांनी अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांना निवेदन दिले. यात शहरात उन्हाचा तडाखा वाढत असताना महापालिकेच्या पाणपोई मात्र शोभेपुरत्या उभ्या आहेत. काहींची पडझड झाली आहे तर काहींचे नळ तुटले आहेत. यामुळे सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. नागरिकांनी त्या पाणपोई दुरुस्त करून द्याव्यात अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
अन्यथा बंद पाणपोर्इंसमोर घेऊ श्रद्धांजली सभा
By admin | Updated: April 2, 2017 01:34 IST