नाशिक : कपिला-गोदावरी संगमावरच साधुग्राम असावे अशी आग्रही मागणी करून, तपोवनातील जागेवरील अतिक्रमण तातडीने काढण्यात यावे, शाही मिरवणूक मार्गाचे रुंदीकरण करावे व नाशिकच्या कुंभमेळा नियोजनासाठी कुंभमेळा प्राधिकरण गठित करावे अशी मागणी करीत, तोंडावर येऊन ठेपलेल्या सिंहस्थाचे काम संथगतीने सुरू असल्याबद्दल साधू-महंतांनी नाराजी व्यक्त केली. जिल्हाधिकारी कार्यालयात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीची माहिती देण्यासाठी प्रमुख साधू-महंत व शासकीय अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजन आराखड्याबाबत माहिती सादर करून, गेल्या वेळच्या मेळ्यापेक्षाही यंदाचा कुंभमेळा अधिक दर्जेदार करण्याची ग्वाही दिली. या बैठकीत साधू-महंतांनी तपोवनातील साधुग्रामसाठी आरक्षित असलेल्या जागेवर प्रशासनाने बांधकामांना परवानगी कशी दिली, असा जाब विचारला. गेल्या कुंभमेळ्यातच जागेचा प्रश्न उपस्थित झालेला असताना, दहा वर्षांच्या कार्यकाळात तपोवनात झालेली बांधकामे वेळीच का रोखली नाहीत असा सवाल करून, सरकारने आता साडेतीनशे एकर जागा आरक्षित करावी, या जमिनीच्या संरक्षणासाठी समिती गठित केली जावी व या जागेवर बांधकामांना कायमस्वरूपी अनुमती नाकारावी, अशी मागणीही करण्यात आली. जिल्हा प्रशासनाने यापूर्वी स्थानिक साधू-महंतांची बैठक घेऊन म्हणणे जाणून घेतले होते परंतु त्याची पूर्तता केली नाही असे सांगून, गेल्या कुंभमेळ्यात दोन-तीन वर्षांपूर्वी कामे सुरू करण्यात आली होती. यंदा मात्र अजूनही कोठेच काम सुरू असल्याचे दिसत नाही. प्रशासनाची अशीच गती असेल तर कामे कशी पूर्ण होणार, असा प्रश्न विचारण्यात आला. साधुग्राम व शाही मार्ग या दोन्ही गोष्टींविषयी कोणताही बदल होऊ शकत नाही, त्यामुळे प्रशासनाने साधुग्रामच्या जागेचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दोन-तीन महिने अगोदरपासूनच स्थानिक आखाडे, मठांमध्ये बाहेरगावाहून साधू-महंतांचे आगमन सुरू होते. आखाड्यांकडून त्यांची व्यवस्था केली जाते; परंतु प्रशासनाकडून काहीच मदत मिळत नाही. त्यासाठी किमान मूलभूत सुविधा प्रशासनाने पुरवाव्यात. तसेच गेल्या वेळी जमीन आरक्षित केलेल्या शेतकऱ्यांना त्याचा मोबदला अद्याप मिळालेला नाही. लक्ष्मीनारायण मंदिराच्या जागेचाही वापर करण्यात आला, त्यांनाही मोबदला दिला गेलेला नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. या बैठकीस महंत ग्यानदास, धरमदासजी, राजेंंद्रदासजी, शिवनाथजी, स्वामी संविदानंद, भक्तिचरणदासजी, श्यामसनेहीदासजी, कृष्णदासजी, रामलखनदासजी यांच्यासह विभागीय आयुक्त एकनाथ डवले, महापौर यतिन वाघ, उपमहापौर सतीश कुलकर्णी, जिल्हाधिकारी महेश पाटील,
साधुग्राम स्थलांतरास महंतांचा विरोध
By admin | Updated: July 31, 2014 00:54 IST