घोटी : सिंहस्थासाठी नाशिकला येत असलेल्या मुंबईच्या भाविकांच्या वाहनाचे वाडीवऱ्हेजवळ टायर फुटल्याने झालेल्या अपघातात कल्याण येथील गीता पुष्करलाल पुरोहित (६१) या महिलेचा मृत्यू झाला असून, अन्य सहाजण गंभीर जखमी झाले आहेत़ मंगळवारी (दि़ २५) सकाळी घडलेल्या या अपघाताची वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़कल्याण येथील रहिवासी पुष्करलाल पुरोहित (६४), गीता पुष्करलाल पुरोहित (६१), नरेंद्रसिंह शेखावत (४८), शशी शर्मा (३४), कौर शेखावत (७०), राजेंद्र शेखावत (६१) व महेश शर्मा (२५) हे मंगळवारी सकाळी सिंहस्थासाठी खासगी वाहनाने नाशिकला येत होते़ वाडीवऱ्हे गावाजवळ आल्यानंतर अचानक त्यांच्या कारचे टायर फुटल्याने कार उलटली़ यामध्ये गीता पुरोहित या जागीच ठार झाल्या, तर उर्वरित सहा जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर नाशिकमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ या अपघाताची माहिती मिळताच वाडीवऱ्हेचे पोलीस निरीक्षक मनोहर पाटील सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले़ त्यांनी जखमींना तातडीने नाशिक येथील जिल्हा रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल केले़ (वार्ताहर)
वाडीवऱ्हेजवळ अपघातात वृद्धा ठार
By admin | Updated: August 26, 2015 23:48 IST