मालेगाव कॅम्प : गेल्या काही दिवसांपासून मालेगाव शहरात वीज कंपनीतर्फे केल्या जाणाऱ्या वाढीव भारनियमनाच्या निषेधार्थ वीज कंपनीच्या मोतीभवन कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. भारनियमन प्रमाण कमी करण्यात येईल, असे आश्वासन कार्यकारी अभियंता एस. एस. आडे यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. वाढीव भारनियमनामुळे शहरातील यंत्रमागासह इतर उद्योग व्यवसायावर दुष्परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी बारा बंगला भागातील वीज कंपनीच्या मोतीभवन या मुख्य कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. तेथे मोर्चाचे छोटेखानी सभेत रुपांतर झाले. शहरातील परिस्थिती व आगामी सण-उत्सव लक्षात घेता वाढीव भारनियमन रद्द करण्याची मागणी करण्यात आली. सदर आंदोलन अचानक करण्यात आले. वीज कंपनीचे मुख्य अभियंता एस. एस. आडे हे ग्रामीण भागात दौऱ्यावर गेले असल्याने ते लागलीच आंदोलनस्थळी उपस्थित राहू शकले नाही. त्यामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये काही काळ संतप्त भावना उमटल्या. तब्बल दोन अडीच तासांनंतर अभियंता आडे घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करुन शहरातील कंपनीच्या ग्रुप जी३ ऐवजी ग्रुप ई प्रमाणे कमी प्रमाणात भारनियमन करण्यात येईल असे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. मालेगाव शहर कॉँग्रेसतर्फे हे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार शेख रशीद, उपमहापौर जमिल अन्सारी, गाझी अमानुल्ला खान, विठ्ठल बर्वे आदिंची यासंदर्भात भाषणे झाली.या आंदोलनात मनपा स्थायी समिती सभापती अस्लम अन्सारी, माजी स्थायी सभापती इरफान अली, साबीर गौहर, शकील बेग, एजाज वजीर, हाफीज अन्सारी, मोहंमद सुलतान, नवीद खतीब आदि कॉँग्रेस कार्यकर्ते - पदाधिकारी आदि उपस्थित होते. (वार्ताहर)
मालेगावी वीज कंपनी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन
By admin | Updated: August 21, 2014 00:13 IST