पाथर्डी फाटा : परिसरात यावर्षी पोलिसांच्या ताठर आणि कठोर भूमिकेमुळे गणेशोत्सवात मंडळांची संख्या कमी झाल्याचे पहायला मिळत असून, गल्ली-बोळातली लहान- मोठी मंडळे कारवाईच्या धास्तीने गायब झाल्याचे चित्र आहे. याचा गणेशोत्सव शांततेत पार पडण्यासारखा चांगला परिणाम होणार असला तरी अनेक लहान मुलांची छोटी-छोटी मंडळे आणि काही कार्यकर्ते एकत्र येऊन एखादा उत्सव साजरा करताना पोलिसी कारवाईच्या भीतीने नाराज झाल्याचे समोर आले आहे. मनपा निवडणुकीच्या तोंडावर साजरा होणारा गणेशोत्सव खरे तर अधिक उत्साहात, धामधुमीत व मंडळांच्या संख्येत वाढ होऊन साजरा होईल, असे सामान्य नागरिकांना वाटत होते. काहींनी तशी तयारीही सुरू केली होती. मात्र उत्साहापूर्वी ठिकठिकाणी पोलिसांनी घेतलेल्या बैठका, त्यात मांडलेली भूमिका आणि त्यांच्या माध्यमांमधून आलेले वृत्त याचा अर्थ लावताना आपल्यावरही एखाद्या नजरचुकीने झालेल्या चुकीमुळे पोलिसांचा ससेमिरा मागे लागेल की काय ? या धास्तीने अनेकांनी या भानगडीत पडण्याचे टाळले आहे. उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांचा धाक आवश्यक असला तरी त्याचा अतिरेक होणे ही बाब चांगली नसल्याची चर्चा दबक्या आवाजात सर्वत्र ऐकायला मिळत आहे. रोज माध्यमांमधून जाहीर होणारी पोलिसांची नियमावली गणेशोत्सवासाठी कटकटीची असल्याच्या प्रतिक्रि या व्यक्त केल्या जात आहेत.या नियमावली व त्यांच्या अंमलबजावणीविषयी गणेश मंडळांचे व इतर छोट्या-छोट्या ग्रुप्सचे कार्यकर्ते जाणकारांकडे व माध्यम प्रतिनिधींकडे चौकशी करताना दिसून येतात. परिणामी प्रामाणिकपणे व शांततेत उत्सव साजरे करू इच्छिणाऱ्यांचा उत्साह व तयारीला पोलिसांच्या सध्याच्या अति ताठर भूमिकेमुळे ब्रेक लागल्याचे वातावरण प्रभाग क्र . ५२ मध्ये पहायला मिळत आहे. जी मंडळे उपद्रवी आहेत किंवा ज्यांच्याविषयी तक्र ारी आहेत त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावीच मात्र कायद्याच्या अतिरेकी धाकात सोसायट्या, गल्ल्यांमधील मुलं, महिलांच्या छोट्या-छोट्या उत्सवाला असा प्रतिबंध करणे योग्य नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
गणेशोत्सवात मंडळांची संख्या घटली
By admin | Updated: September 6, 2016 01:07 IST