नाशिक : महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठाच्या पीएच.डी. कृषी विस्तार व एम. एस्सी. कृषी विस्तार या पदव्यांशी नामसदृश पदव्या नियमबाह्य पद्धतीने देण्याचा प्रताप यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विद्याशाखेने सुरू केला आहे. विशेष म्हणजे विद्यापीठानेच आपल्या संकेतस्थळावर भारतीय कृषी अनुसंधान परिषदेची या शिक्षणक्रमास मान्यता नसल्याचेही जाहीर केले आहे. त्यामुळे या आभासी पदव्या निर्माण करण्याचा अट्टाहास कशासाठी निर्माण झाला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कृषी शिक्षणाबाबतचे निकष डावलून भारतीय कृषी अनुसंधान परिषदेची मान्यता नसताना दिलेल्या नामसदृश ‘कृषी विस्तार पीएच.डी. व एम. एस्सी’ या शिक्षणाक्रमातून विद्यार्थ्यांची मोठी फसवणूक होण्याची शक्यता आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने कृषी शिक्षणक्रम व कृषी शिक्षक नेमणुकीचे नियम तयार करण्याचे अधिकार कृषी अनुसंधान परिषदेला दिले आहेत. मुक्त विद्यापीठाने मात्र कृषी विस्तार पीएच.डी. व एमएस्सी हे शिक्षणक्रम मान्यतेविना सुरू करण्याचा घाट घातला आहे. विद्यापीठाने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबतची कबुली दिली असून, ‘भारतीय कृषी अनुसंधान परिषदेची या शिक्षणक्रमास मान्यता नाही, त्यामुळे विद्यापीठातून कृषी विस्तार पीएच.डी. व एम. एस्सी पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक पदावर काम करता येणार नसल्याचेही जाहीर केले आहे. यासाठी विद्यापीठाने पात्रता नसलेले शिक्षक तथा मार्गदर्शकांची नेमणूक केल्याने या पदव्या व पीएच.डी. देण्याबाबतचा विद्यापीठाचा एवढा आटापिटा का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मुक्त विद्यापीठातील २००९ नंतरच्या सर्व पीएच.डी. पदव्यांना अपात्र ठरविले आहे. एकीकडे विद्यापीठाने स्वत:च्या संकेतस्थळावर कबुली द्यायची की हे शिक्षणक्रम केलेले विद्यार्थी शैक्षणिक पदावर काम करू शकणार नाहीत. तर दुसरीकडे मात्र याच प्रक्रियेतून बाहेर पडलेल्या आणि हाच अभ्यासक्रम शिकलेल्या व्यक्तीला विद्यापीठ गाइड व शिक्षक म्हणून नियुक्त करीत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (प्रतिनिधी)
आता पीएच.डी.ला समांतर पदव्यांचा आभास
By admin | Updated: August 8, 2015 23:38 IST