लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : समृद्धी महामार्गासाठी करण्यात येणाऱ्या भूसंपादनात दहा जिल्ह्यांमधील ३० तालुक्यांच्या १५६ गावांधील सुपीक जमिनी, विहिरी, अनेक गोठे यांसह हजारो कुटुंबांच्या घरावर समृद्धीचा वरवंटा फिरवला जात असून, यातून कोणाची समृद्धी साधली जाणार, असा सवाल उपस्थित करतानाच हा समृद्धीचा नव्हे, तर शेतकऱ्यांच्या बरबादीचा महामार्ग असल्याचे सांगत समृद्धीविरोधी कृती समितीच्या नानासाहेब पळसकर यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. पळसकर म्हणाले, सरकार क र्जमाफीसाठी ३० हजार कोटी रुपये नसल्याचे सांगते. मग समृद्धी महामार्गासाठी लागणारा ४६ हजार कोटींचा निधी कसा उपलब्ध होणार आहे? मराठवाड्यात औरंगाबादमध्ये औद्योगिक वसाहतींसाठी चार हजार रुपये प्रति एकरने संपादित केलेली जमीन विकासाविना पडून आहे.ती आता कोट्यवधी रुपयांनी विकली जात आहे. या जमिनींचा योग्य मोबदला मिळाला नसताना समृद्धी महामार्गासाठी पोलीसबळाचा वापर करून हिटलरशाही मार्गाने मोजणी करण्याचा प्रयत्न होत आहे. अशाप्रकारे दबावतंत्राचा वापर करून कदापि भूसंपादन होऊ देणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
समृद्धी नव्हे, शेतकऱ्यांच्या बरबादीचा मार्ग
By admin | Updated: May 20, 2017 01:36 IST